पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
समाजात प्रेम, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘ज्ञान माऊली’ हा उपक्रम राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचे ७५० वे वर्ष राज्यभर मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत असून, राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने पुणे महसूल विभागातील सर्व तालुक्यांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळी ‘ज्ञान माऊली’ या भक्तिमय संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वेरीमध्ये देखील या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद लाभला.
राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या पुढाकारातून या अभिनव संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात आली. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वेरीच्या खुल्या रंगमंचावर ‘ज्ञान माऊली’ या भक्तिमय संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवनकार्य, साहित्य, विचार आणि आध्यात्मिक संदेश संगीत, अभंग, नृत्य, नाट्य व विविध कलाविष्कारांच्या माध्यमातून उपस्थित श्रोत्यांसमोर मांडण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांनी आणि भक्तिमय सादरीकरणाने कार्यक्रमस्थळी आध्यात्मिक व भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. प्रमुख पाहुण्या शर्वरी कुलकर्णी यांनी 'संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आणि त्यांचे महान साहित्य येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.’ असे सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराजांनी मांडलेला वैज्ञानिक दृष्टिकोन, ‘मैत्र जीवांचे’ ही बंधुभावाची भावना, तसेच भूतदया आणि विश्वकल्याणाची संकल्पना आजच्या काळातही तितकीच महत्त्वाची आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त राज्यातील विविध भागांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आलेल्या या ‘ज्ञान माऊली’ कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा जागर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम संस्मरणीय ठरला. या कार्यक्रमास पंढरपूर पंचक्रोशीतील झंकार कुलकर्णी, रूपक कुलकर्णी, पियुष आवारे, सर्वदा मोहोळकर, कौस्तुभ चांगभले, जयेश कुलकर्णी, आदिता कुलकर्णी, वेणूगोपाळ संगीत विद्यालय मधील कलावंत, वारकरी बांधव, भाविक, नागरिक, रसिक, कार्यक्रमाचे समन्वयक धीरज साळुंखे व संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) चे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ. एम. जी. मणियार, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा. एस.व्ही.मांडवे, स्वेरी लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ.बनकर, डिग्री इंजिनिअरिंगच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपती, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एन. ए. तळवलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

