पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
कर्मयोगी श्रद्धेय स्व. सुधाकरपंत परिचारक (मालक) यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया (लेन्ससहित) तसेच सर्व रोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर तब्बल दहा दिवस चालणार असल्याची माहिती पांडुरंग परिवाराचे युवा नेते प्रणव परिचारक यांनी दिली.
पांडुरंग परिवार युवक आघाडी व प्रणव परिवार युवा मंच, पंढरपूर यांच्या वतीने हे नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले असून, शंकरराव साळवे नेत्र रुग्णालय, सोलापूर (एच. व्ही. देसाई आय इन्स्टिट्यूटचा प्रकल्प)यांचे विशेष सहकार्यातून तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील ज्या मदतीने हे शिबिर घेतले जाणार आहेत.
या आरोग्य उपक्रमांतर्गत ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तालुक्यातील विविध गावांमध्ये सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यासाठी सोलापूर आणि पुणे येथील डॉक्टर उपस्थित राहतील. महत्वाचे म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून मोतीबिंदू मुक्त डोळस पंढरपूर तालुका करण्याचा संकल्प प्रणव परिचारक यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
नेत्र तपासणी शिबिराची सुरुवात ही ११ ऑगस्ट रोजी तुंगत पासून होईल. तुंगत नंतर पुढे , १२ ऑगस्ट रोजी गादेगाव , १३ ऑगस्ट रोजी खर्डी, १४ ऑगस्ट रोजी उंबरे-पागे आणि १६ ऑगस्ट रोजी रांजणी येथील आरोग्य केंद्रात शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १८ ऑगस्ट रोजी कासेगाव , १९ ऑगस्ट रोजी रोपळे, २० ऑगस्ट रोजी पुळुज, २१ ऑगस्ट रोजी करकंब ग्रामीण रुग्णालय आणि २२ ऑगस्ट रोजी भाळवणी येथे आरोग्य तपासणी शिबिर होऊन समारोप होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदू आढळल्यास पुढील मोफत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अद्ययावत अशा सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांना मोफत घेऊन शस्त्रक्रिया करून दिली जाणार आहे. यासोबतच विविध आजारांचे मार्गदर्शनही तज्ञ डॉक्टरांकडून होईल.
ग्रामीण भागातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रणव परिचारक यांच्या वतीने करण्यात आले आहे. स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृती जपत आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

