पटवर्धन कुरोली प्रतिनिधी तेज न्यूज
अलीकडील मुसळधार पावसामुळे परिसरातील बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेल्याने स्थानिक नागरिक, शेतकरी तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या मार्गावरून दररोज होणारी वाहतूक विस्कळीत झाली होती तसेच शेतमाल ने-आण करताना नागरिकांना धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.
ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते अनिल सावंत यांनी कोणत्याही शासकीय मदतीची प्रतीक्षा न करता स्वखर्चातून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या भरावाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. स्थानिक पातळीवर आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध करून देत त्यांनी हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
सध्या या ठिकाणी दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरून नागरिकांना अधिक सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक करता येणार असून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
अनिल सावंत यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांकडून विशेष कौतुक होत आहे. “समाजासाठी पुढे येऊन स्वतःच्या खर्चातून काम करणे हे खरोखरच प्रेरणादायी आहे,” अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, प्रशासनानेही अशा लोकहिताच्या उपक्रमांची दखल घेऊन आवश्यक ती तांत्रिक व आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे उपक्रम वाढल्यास ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही नागरिकांचे मत आहे.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, नारायण शिंदे, ग्रामपंचायत सदस्य अनिल लामकाने, स्वप्निल राऊत,शिवाजी पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

