अक्कलकोट प्रतिनिधी श्रीशैल गवंडी प्रतिनिधी तेज न्यूज
जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोटचे युवा नेतृत्व व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व नगरसेवक महेश मालक इंगळे यांचे सुपूत्र प्रथमेश मालक इंगळे यांनी आपल्या मित्र परिवारासह श्री स्वामी समर्थांना साकडे घातल्यानंतर मुंबई येथील लालबागच्या राजाचे दर्शन घेत जिल्ह्यात चांगला पाऊस पडावा यासाठी साकडे घातले.
यावेळी लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी प्रथमेश इंगळे यांचा सन्मान केला. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रथमेश इंगळे भावूक होऊन म्हणाले की आज सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती खूप बिकट आहे. यंदा पाऊसच नाही, धरणे कोरडी आहेत, शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे आणि अंगाची लाहीलाही करणारे ४० डिग्री तापमान आहे.
शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. म्हणूनच आज मी लालबागच्या राजाच्या चरणी एकच साकडे घातले आहे की राजा आमच्या सोलापूर जिल्ह्यावर कृपा कर, अक्कलकोटच्या शेतकऱ्यावर कृपा कर, भरपूर पाऊस पाड आणि हा दुष्काळ दूर कर असे मागणे मागून बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे असे मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी त्यांच्या समवेत सोलापूरचे स्वप्नील गायकवाड, आशिष सातपुते, तन्मय इचगे, आदित्य गवंडी, आदित्य जगधनी, समर्थ भोसले, धनराज स्वामी, अविनाश अंधारे उपस्थित होते.

