नवी मुंबई प्रतिनिधी सुभाष मुळे तेज न्यूज
नेरुळ येथील युथ कौन्सिल नेरुळ या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून समर्थ शहा या लहान मुलाच्या वाढदिवसाप्रित्यर्थ वनवासी कल्याण आश्रम संचलित, पनवेल तालुक्यातील चिंचवली येथील वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू याबरोबरच तांदूळ, डाळ, साखर, गोडेतेल, चहा पावडर आदि दररोजच्या जीवनातील आवश्यक त्या गरजेच्या वस्तू वितरित करण्यात आल्या.
आश्रमात एकूण ३१ विद्यार्थी वास्तव्यास असून त्यांना एक वेळचे गोड जेवणही देण्यात आले. संस्थेचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष बिक्रम राम यांच्या पुढाकाराने दिनांक ३०.८. २०२६ रोजी चिंचवली येथील आश्रमाच्या सभागृहात पार पडलेल्या या उपक्रमात आश्रमाचे केंद्रप्रमुख दिलीप बरफ, संस्थेचे जी. आर. पाटील, अशोकराव महाजन, दत्ताराम आंब्रे, दिलीप चिंचोळे, रवींद्र कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या सुंदरशा अशा स्वागत गीताने झाली. दिलीप बरफ यांनी आश्रमाच्या कार्याचा आढावा घेऊन मुलांची दिनचर्या व मुलांच्या वैयक्तिक विकासासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना करुन देऊन सांगितले की, आदिवासी मुलांनी शिक्षण घेणे आज काळाची गरज बनली आहे कारण आदिवासी सुशिक्षित झाला तर देशाच्या प्रगतीलाही चांगला हातभार लागेल.
दत्ताराम आंब्रे यांनी मुलांशी संवाद साधताना सांगितले की, तुम्ही कष्टपूर्वक चांगले शिक्षण घ्या, शिकून खूप मोठे व्हा त्यामुळे तुमच्या कुटुंबा बरोबरच देशाचीही प्रगती होण्यास हातभार लागेल. जेव्हा तुम्ही उच्च शिक्षणासाठी या आश्रमातून बाहेर पडाल आणि सर्वार्थाने चांगले सक्षम व्हाल तेव्हा या आश्रमात तुम्ही राहिला आणि स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून आणलात याची जाणीव ठेवा. असे सांगून त्यांनी युथ कौन्सिल नेरुळ या संस्थेच्या कार्याची थोडक्यात ओळख करुन देऊन सांगितले की गेली ३३ वर्ष युथ कौन्सिल संस्थेच्या माध्यमातून या आश्रमातील मुलांना सातत्याने विविध स्तरावर मदत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही संस्थेच्या स्वयंसेवकांसाठी समाधानाची बाब आहे.
कारण तुमच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हा कार्यकर्त्यांना अधिक काम करण्यास प्रोत्साहन देतो. शेवटी दिलीप बरफ यांनी सर्वांचे यथोचित आभार मानले.

