पंढरपूर प्रतिनिधी अमोल कुलकर्णी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे खाजगी सिताराम साखर कारखाना सुरू आहे. सदर कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणारी राख व बग्यास या उपद्रवामुळे परिसरातील अनेक स्थानिक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कारखान्याने राखेच्या संदर्भात प्रदूषण मुक्तीची आणलेली मशीन बंद ठेवली असल्याने जवळपास पाच किलोमीटर परिसरात असणारी पिके तसेच घरांमधून राखेचे लोट दिसून येत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या स्थानिक अबालवृद्ध स्थानिकांना श्वसनाचे विकार जडले असल्याचे दिसून येत आहे. कारखान्याने दूषित पाणी प्रक्रिया प्रकल्प न उभारल्याने अनेक विहिरींना व आजूबाजूच्या विंधन विहिरीला दूषित पाणीपुरवठा होऊ लागला आहे .त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जाऊ लागले असल्याची तक्रार आजूबाजूचे ग्रामस्थ करीत आहेत याबाबत कारखाना प्रशासनाशी अनेक वेळा वारंवार पत्र व्यवहार करून देखील तसेच लेखी निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी कारखान्याच्या गेट समोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
यावेळी अनिल आगावणे, गजानन घाडगे,विष्णू सुळे, काशिलिंग सुळे,राजू पुंडेकर यांच्यासह अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीने कोणतेही निकष पात्रता पूर्ण न करता वेळोवेळी गाळप परवाने का दिले असाच जाब सरपंच, उपसरपंच यांना विचारल्याने संबंधितांनी तेथून काढता पाय घेतल्याचे दिसून आले. सदर कारखान्याचे प्रदूषण चाचणी नियामक मंडळाने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थातून दिसून येत आहे.
कोट याबाबत कारखाना प्रमुख श्रीमती राजलक्ष्मी गायकवाड यांनी आंदोलन स्थळी भेट दिली तथापि जुजबी उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला त्यांच्याशी सविस्तर माहितीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांनी फोन घेणे टाळले.

