पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
वीर आणि उजनी धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आल्याने चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. प्रशासनाकडून चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले असून, स्थलांतरीत नागरिकांना श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती मार्फत फुड पॅकेट वाटप करण्यात येत आहेत. तसेच चंद्रभागा नदीपात्रात जीवरक्षकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सद्यस्थितीत, पंढरपूर शहर व परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रभागा नदीच्या पातळीने धोक्याने पातळी ओलांडली असल्याने स्थानिक प्रशासनामार्फत अनेक घरे स्थलांतरित करण्यात आली आहेत. सध्या उद्भवलेली पूरजन्य परिस्थिती हटवण्यासाठी व बचाव कार्य करण्यासाठी तसेच मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून मंदिरे समिती मार्फत बाधित कुटुंबियांना फुड पॅकेट वाटप करण्यात आली.
त्यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत व विभाग प्रमुख विनोद पाटील उपस्थित होते.
याशिवाय, चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने जीवरक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनामार्फत बोट उपलब्ध करून देण्यात आली असून, या बोटीस मंदिर समिती मार्फत इंधन व इतर अनुषंगीक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात असल्याची माहिती प्र. कार्यकारी अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.