पुणे प्रतिनिधी सागर बोदगिरे तेज न्यूज
देशातील केंद्र सरकारने मागील दहा वर्षात १६९ हून अधिक श्रेणीतील कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ई-श्रमिक कार्डच्या माध्यमातून कामगारांना सक्षम करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार प्रयत्नशील आहे. आज देश चालवणारे आणि देश बनवणारे श्रमिक आहेत यामुळेच केंद्र सरकार श्रमिकांच्या हिताचे काम करत असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चॅटर्जी यांनी केले.
न्यू पुना क्लब येथे भारतीय जनता मजदूर सेल (BJMC) महाराष्ट्र राज्याचे ओळखपत्र व सभासद कार्डचे वितरण आणि ई-श्रमिक कार्डची नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी चॅटर्जी बोलत होते. याप्रसंगी भारतीय मजदूर सेलचे राष्ट्रीय सचिव संजय अग्रवाल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष दीपक शर्मा, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जयेश टांक, भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष आणि कार्यक्रमाच्या आयोजक ज्योती सावर्डेकर, भाजप व्यापारी संघ पुणे अध्यक्ष उमेश शाह,निवृत्त आयपीएस अधिकारी विजय चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्यातील विविध शहरातून आलेल्या शंभराहून अधिक पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचे वाटप आणि ई-श्रमिक कार्डची नोंदणी तसेच सभासदांना सदस्य प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
पुढे बोलताना चॅटर्जी म्हणाले,भारतीय जनता मजदूर सेल म्हणजे कामगार हित असे समीकरण मागील दहा वर्षात बनले,आम्ही कामगारांना मजबूर नव्हे तर मजबूत बनवण्यासाठी काम करत आहोत.आज महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी मधील पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र आणि ई-श्रमिक कार्डची नोंदणी करण्याच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारची कामगार हिताची ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याच्या मोहिमेचा शुभारंभ केला आहे. लवकरच राज्यातील प्रत्येक शहर आणि गावातील कामगारांची आम्ही ई-श्रमिक कार्ड मध्ये नोंदणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करणार आहोत.
प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर म्हणाल्या, भारतीय जनता मजदूर सेल हा माझ्यासाठी कुटुंब आहे, प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून मी माझ्या या कुटुंबातील प्रत्येक कामागारांचे हित जपण्याचा प्रयत्न करत आहे. कामगार नेत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन अलीकडच्या काळात बदलला आहे, मात्र भारतीय जनता मजदूर सेलच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून समाजाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. आज पुण्यासह राज्यातील प्रमुख शहरातील पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र आणि ई-श्रमिक कार्डची नोंदणी करण्यात आली आहे, लवकरच प्रत्येक कामागारांपर्यंत आम्ही जाणार असून यामध्ये घरेलू कामगार महिला, रिक्षाचालक यांच्यासह असंघटित कामगारांचा समावेश असेल. तसेच एसटी महामंडळाने अचानक सेवा समाप्त केलेल्या हमालांनी आज आमच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या समस्या सांगितल्या आहेत, त्यांच्या समस्यांचे लवकरच निराकरण करण्यात येईल असेही सावर्डेकर यांनी नमूद केले.
याप्रसंगी ओळखपत्र आणि ई-श्रमिक कार्डची नोंदणी केलेले पदाधिकारी निलेश मकवाना,ॲड प्रणाली चव्हाण,यतीन माने ,मुंबईचे संतोष कसबे,कोल्हापूरच्या अरुणा कवठेकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी तर आभार राजेंद्र शितोळे यांनी मानले.