पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
अवकाळी पाऊस का पडतो याचा विचार केला तर हे लक्षात येते की दरवर्षी जून ते सप्टेंबर हा पावसाळी हंगाम मानला जातो, तर डिसेंबरपर्यंत दक्षिण भारतात परतीचा पाऊस चालू असतो . पण यानंतर जो पाऊस पडतो तो 'अवकाळी' असतो आणि तो विविध कारणांनी निर्माण होतो.
यामध्ये प्रमुख कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यातील समुद्रपृष्ठभागाच्या तापमानात होणारा फरक . हवेचे गरम व थंड थर तयार होऊन बाष्प निर्माण होते व ते ठराविक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस घडवते. यासोबतच "इंडियन ओशन डायपोल" (IOD) नावाचा एक सागरी प्रवाहसुद्धा मोठ्या प्रमाणावर परिणाम करतो . याचा एक टोक आफ्रिकेपासून तर दुसरे टोक ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेले असते. या चक्रीय प्रणालीचे दोन टप्पे असतात – पॉझिटिव्ह फेज ज्यात आपल्याकडे जास्त पाऊस पडतो, आणि निगेटिव्ह फेज ज्यात ऑस्ट्रेलिया भागात पाऊस जास्त पडतो, तर आपल्याकडे तो कमी होतो किंवा थांबतो . नोव्हेंबरनंतर या बदलाच्या टप्प्यात (Transition Phase) जेव्हा एक टप्पा दुसऱ्याकडे सरकतो, तेव्हा अवकाळी पावसाची शक्यता जास्त असते. त्यामुळे भारतासह आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया अशा विविध भागात अशा पावसाचे प्रमाण दिसते . शिवाय स्थानिक घटक जसे की बेसुमार जंगलतोड, प्रदूषण, ज्वालामुखी, यामुळे सुद्धा ही प्रणाली डगमगते .
यामुळे पावसाचा अंदाज लावणे कठीण होते आणि हवामान खात्याचे अंदाज अनेकदा उशिरा किंवा अचूक न ठरण्याचे कारण ठरते. म्हणून भारतीय उपखंडातील हवामान ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, जी केवळ एका कारणामुळे नाही तर विविध स्थानिक व जागतिक घटकांच्या संयोगामुळे नियंत्रित होते.