आटपाडी प्रतिनिधी तेज न्यूज
शिवाजी विद्यापीठ संलग्नित श्रीराम बहुउद्देशीय शिक्षण संस्था, आटपाडी संचलित श्री. तानाजीराव पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय, आटपाडी येथे बी.एड. (2023–25) बॅचचा शुभचिंतन व निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रा. एन. व्ही. मोहिते (वैभव शिक्षण संस्था, विटा) होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. आर. एल. कोकरे यांनी भूषवले. यावेळी प्रा. डॉ. गिरी ए. बी., प्रा. व्ही. के. पांढरे, प्रा. जी. डी. तोरणे, प्रा. टिंगरे, प्रा. कदम, तसेच कार्यालयीन कर्मचारी श्री. देशमुख, सौ. जाधव, श्री. पाटील आणि सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थी लेखक स्वप्निल जमदाडे यांनी ‘आयुष्य जगताना’ हे स्वतःचे पुस्तक शिक्षकांना अनमोल भेटवस्तू म्हणून दिले.
प्रा. मोहिते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, "शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून, ते ज्ञानसंपादनासाठी असले पाहिजे."डॉ. गिरी यांनी मत व्यक्त केले की, "सर्व पेशांमध्ये पवित्र आणि मानाचा पेशा हा शिक्षकाचा असतो."प्रा. पांढरे म्हणाले, "आदर्श विद्यार्थी घडवण्याआधी आपण स्वतः आदर्श शिक्षक बनणे आवश्यक आहे."
प्रा. तोरणे यांनी सांगितले की, "सहज आणि सोप्या मार्गाने मिळालेलं ज्ञान फार काळ टिकत नाही, परंतु परिश्रमाने मिळालेलं यश कायमस्वरूपी असतं."
प्रा. कदम यांनी म्हटलं की, "मनुष्य हा जन्मभर विद्यार्थीच असतो; त्यामुळे ज्ञान ग्रहण करण्यात कधीही संकोच करू नये."प्रा. टिंगरे यांनी विद्यार्थ्यांना योग्य ध्येय निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले.प्रशिक्षणार्थी स्वप्निल जमदाडे, अमोल साठे आणि रत्नश्री चंदुरे यांनी दोन वर्षांच्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करत महाविद्यालयावरील आपुलकी व्यक्त केली.
शेवटी अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रा. कोकरे म्हणाले, "सततच्या कष्टांसमोर पराभवही हार मानतो. म्हणून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि मेहनतीने अध्यापन क्षेत्रात काम सुरू ठेवावे. काळानुरूप नव्या कौशल्यांचे अधिग्रहण करावे."
त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींकडून एक गुरुदक्षिणा घेतली — “मी रोज किमान चार तास अभ्यास करीन आणि टीईटी, सीटीईटी, टेटसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश मिळवीन.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शेळके यांनी, प्रास्ताविक सुल्ताना मुल्ला यांनी, तर आभारप्रदर्शन सौ. निर्मला राजगे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वप्निल जमदाडे, अभिजीत सावंत, अमोल साठे, विशाल घोडके, अक्षय वाघापुरे, अमरजीत गाजरे, विजय तोरणे आणि इतर प्रशिक्षणार्थींनी खूप मेहनत घेतली.
कार्यक्रमावेळी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.