सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
परसबाग सोलापूर आणि देशी वृक्ष संवर्धिनी, सोलापूर यांच्यावतीनें यंदाच्या कडक उन्हाळ्यात झाडे जगवण्यासाठी एक बाटली पाणी झाडासाठी हे लोकसहभाग अभियान राबविण्यात येणार आहे.रविवार दि.१६ रोजी प्रातिनिधिक स्वरूपात या अभियानाचा प्रारंभ करण्यात येणार आहे.
सोलापूरमधील उन्हाळ्यात साधारणपणे ४० ते ४४ अंश सेल्सिअस इतके तापमान सातत्याने असते.कोरडी हवा,गरम वारा आणि वाढत्या तापमानातील सातत्य यामुळे वाढीस लागलेली रोपे जळण्याचे प्रमाणही मोठे आहे.असं असतानाही संपूर्ण शहरात दरवर्षी हजारो वृक्षांचे रोपण केले जाते. अशा स्थितीत प्रशासकीय प्रयत्न कमी पडतात.त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या नात्यानें परसबाग सोलापूर आणि देशी वृक्ष संवर्धिनी, सोलापूर यांनी अभ्यासपूर्वक या लोकसहभाग अभियानाची रचना केली आहे. त्याचा प्रातिनिधिक शुभारंभ दि.१६ मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती परसबाग सोलापूरचे संस्थापक नारायण पाटील यांनी दिली आहे.
अशी आहे संकल्पना...
परसबाग सोलापूर आणि देशी वृक्ष संवर्धिनी च्या Motivational & environmental Awareness Development Program अंतर्गत हा उपक्रम आखण्यात आला आहे.
तापत्या उन्हाळ्यात आपण आणि आपल्या घरातील, कार्यालयातील सदस्य जेंव्हा जेंव्हा बाहेर पडतात तेंव्हा तेंव्हा आपण आपल्या सोबत पिण्यासाठी पाण्याची बाटली घेतो.अगदी त्याप्रमाणेच आपण आणखीन एक बाटली पाणी झाडासाठी बरोबर घ्यायची आहे आणि ते पाणी स्वतःला सोयीच्या पण पाण्याची गरज असलेल्या तहानलेल्या झाडाला नियमितपणे घालायचे आहे. अशामुळे तृषार्त असलेल्या त्या झाडांना जिवदान मिळेल. पावसाळ्यात हीच झाडे छान वाढतील.मग आपसुकच शहरात हिरवाई वाढेल.साहजिकच हवेतील आर्द्रतेचे आणि प्राणवायुचे प्रमाणही वाढेल.हे चित्र निश्चितपणे सुखावह असेल.
नारायण पाटील
संस्थापक परसबाग सोलापूर देशी वृक्ष संवर्धिनी, सोलापूर
9960008220