मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
केंद्र सरकारला अखेर उशिरा का होईना जाग आली, पण या जागृतीची किंमत तरुणाईने स्वतःचे रक्त आणि बळी देऊन चुकवली आहे!
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सुपूर्द केला. वरवर पाहता हा देशातील विद्यार्थी आणि तरुणाईचा मोठा विजय वाटत असला, तरी या विजयाच्या जयघोषामागे अनेक तरुणांच्या आत्महत्या आणि सांडलेले रक्त दडलेले आहे, हे विसरून चालणार नाही. आजचे विद्यार्थी ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे, तर संपूर्ण भारताची नवी उमेद, खरी ताकद आणि प्राण आहेत. पण त्यांच्या याच भवितव्याचा आज जो निर्लज्ज बाजार मांडला गेला आहे, तो अत्यंत संतापजनक आहे.
हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे! ज्या मातीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांनी माणुसकीचा संदेश दिला; ज्या शिवरायांनी रयतेचे राज्य स्थापन करून स्त्री-सन्मानाचा आदर्श जगाला दिला; ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा मूलमंत्र दिला आणि ज्या क्रांतीज्योती सावित्रीबाई व महात्मा जोतीराव फुले यांनी शिक्षणाचा पाया रचला... त्याच देशात आज शिक्षणाच्या नावाखाली चाललेला हा काळाबाजार निषेधार्ह आहे.
'नीट' (NEET) पेपरफुटी प्रकरणात काही मोहरांना पकडले असले, तरी यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत? त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे, हीच आमची प्रमुख मागणी होती आणि आहे! खाकी वर्दीत दडलेले गुंड आणि अमानुष अत्याचार याच न्याय्य मागणीसाठी राज्याराज्यांतील तरुणाईने दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततामय मार्गाने आंदोलन पुकारले होते. मात्र, सत्तेचा माज डोक्यात गेलेल्या दिल्ली पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर जो पाशवी हल्ला केला, तो लोकशाहीला काळीमा फासणारा आहे. 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्याचा अवमान करत, कर्तव्याची शपथ घेतलेल्या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला.
सर्वांत भयंकर आणि मानवतेची मान खाली घालायला लावणारी गोष्ट म्हणजे—तरुण मुलींना लाथाबुक्क्यांनी तुडवण्यात आले, त्यांचे कपडे फाडून त्यांना रस्त्यावरून फरफटत नेले गेले! या दडपशाहीत काही पोलीस गणवेशात होते पण त्यांच्या छातीवर नेमप्लेट नव्हती, तर काही साध्या वेशात होते. हे पोलीस होते की पोलिसांच्या वेशात आलेले सत्तेचे गुंड? असा प्रश्न पडावा इतकी त्यांची कृती अमानवीय होती. "दिल्ली पोलिसांच्या अंगात जर एवढीच ताकद आणि देशभक्तीची खुमखुमी सळसळत असेल, तर त्यांनी खुशाल सीमेवर जाऊन शत्रूशी दोन हात करावेत... निशस्त्र विद्यार्थ्यांवर मर्दुमकी गाजवू नये!" राजीनामा ही तर केवळ सुरुवात! धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा म्हणजे भारतीय तरुणाईच्या विजयाची फक्त एक सुरुवात आहे. केवळ एका मंत्र्याच्या राजीनाम्याने हे प्रकरण शांत होणार नाही. ज्या मुजोर पोलिसांनी शांततापूर्ण आंदोलनाला दहशतवादाचे रूप देत तरुणांचे लचके तोडले, त्या सर्वांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा आणि अत्याचाराचा खटला चालवला पाहिजे. भविष्यात लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आणि जीवाशी खेळण्याची हिंमत कोणाचीही होता कामा नये! केंद्र सरकार आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या यंत्रणांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी— "वरच्या काठीला आवाज नसतो, पण ती जेव्हा पडते, तेव्हा भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते!" हक्कांसाठी लढणाऱ्या तरुणाईचे बलिदान आम्ही कधीही व्यर्थ जाऊ देणार नाही.
या गुंड प्रवृत्तीच्या पोलिसांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या लोकप्रतिनिधींना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. अन्यथा, आता फक्त एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला आहे, उद्याचे चित्र काय असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही! कारण, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकरांच्या ज्वलंत विचारांचा आहे!
जय हिंद! जय भारत! जय महाराष्ट्र!

