शिक्षकांच्या गेम बरोबर शिक्षणाचा गेम होतोय..
भारतामध्ये गुरू शिष्य शिक्षणाची परंपरा खूप मोठी आहे. अनेकांच्या जीवनाचा कायापालट करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते.गुरू शिष्याला वाट दाखवतात परंतु आज शिक्षकांच्या जीवनाचीच वाट लागली आहे.गुरुचा आदर व शिष्याची निष्ठा ही भारतीय परंपरा आहे... परंतु अनेक चित्रपट,वेबसिरीज, सोशल मिडियातील रील्स व युट्यूबच्या माध्यमातून शिक्षकांची अर्थात गुरूंची टिंगल उडवली जाते. शिक्षक पेशाची नाहक बदनामी केली जाते.त्यावर कोणी बोलायला तयार नाही.
आज शिक्षकांमध्ये अनेक प्रकार पडले आहेत.अनुदानित शिक्षक, अंशतः अनुदानित शिक्षक, विनाअनुदानित शिक्षक,अर्धवेळ शिक्षक, प्रस्तावित शिक्षक,कंत्राटी शिक्षक,स्वयं अर्थ शासित शिक्षक, मानधनावर काम करणारे शिक्षक, शिक्षण सेवक शिक्षक, तासिका तत्त्वावर काम करणारे शिक्षक त्यातही पगारी व बिगर पगारी शिक्षक.. पगारी शिक्षक खुशीत गाजरे खातो...पण बिगर पगारी शिक्षक आज नरक यातना सहन करीत आहेत.
शिक्षक शिकवण्यापेक्षा शासकीय इतर इतर कामे करण्यात दंग आहेत. ( कामांची यादी पाहिली तर चक्कर येईल) त्या कामामुळेच सरकारी शाळा बंद पडू लागल्या आहेत.इंग्रजी शिक्षणाच्या बाजारीकरणात मराठी शाळांचा श्वास शासनाने तर कोंडून ठेवला आहेच.हे असेच होत राहिले तर एक दिवस गरीबांच्या मुलांनी हक्काचे शिक्षण कुठे घ्यायचे..? ही म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
आज घडीला परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची स्पर्धा वाढली आहे.त्याची कारणमिमांसा करण्याची गरज आहे.पूर्वी व सध्या ब्रेन ड्रेन ही भारतीय अर्थव्यवस्था व सामाजिक स्थितीला लागलेले ग्रहण आहे.हुशार व चांगली लोक देश सोडून चालली आहेत.त्यावर विचार मंथन होणे काळाची गरज आहे.
आज गुरू पेशाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे गुरूकडे बघण्याचा दृष्टीकोन सुध्दा बदलू लागला आहे.मूल्यशिक्षणापेक्षा ...बाजारी शिक्षणाला म्हणजेच फुगवटा शिक्षणाला महत्त्व येऊ लागले आहे.त्यात आर्थिक काळाबाजार कोणालाही रोखणं शक्य नाही.
तोंडांत बोळा कोंबून बुक्का द्यायचे काम गुरूचे इथली व्यवस्था करत आहे.त्याचे फलित हळूहळू मिळत चालले आहे.जाती जाती व धर्मांचे राजकारण करून अविवेकी लाचार पिढी निर्माण होऊ लागली.स्वाभिमान गहाण टाकून जगणारी पिढी तयार होत आहे.
आज अनेक ठिकाणी शाळा आहे पण चांगले शिक्षक मिळेल की नाही याची शाश्वती नाही.चांगले शिक्षक असतील तर त्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षण सुविधा उपलब्ध होतील असे नाही...झाल्याच तर उपलब्ध सुविधेचा वापर करणारेच तज्ञ मिळतील की नाही याची शंका आहे.अशैक्षणिक कामात मास्तर गुंतला आहे.
आज अनेक शैक्षणिक अहवालानुसार दहावी पास, बारावी पास, पदवीधर झालेल्या मुलांना ही लिहिता वाचता येत नाही...ही खरी उथल्या शिक्षणाची शोकांतिका आहे.अशीच पास झालेली मुले कोणत्या स्पर्धेत टिकणार आहेत.
गोरगरीबांच्या मुलांनी स्पर्धेत टिकू नये म्हणून राजकारणात व उद्योगात प्रस्थापित असलेल्या मंडळींनी जाणून बुजून शिक्षकांच्या मानगुटीवर अशैक्षणिक कामेचे भूत बसवून तसेच शाळेचे तोंड न पाहता ही विद्यार्थी कसे पास होतील...याची व्यवस्था निर्माण केली आहे.
म्हणून गेल्या काही वर्षांत अनेक भारतीय मुलांनी परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे परंतु गोरगरीब मुले चांगले शिक्षक व चांगल्या शिक्षणव्यवस्थेला मुखून परदेशी बनत चालले आहेत.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.ते पिल्यानंतर प्रत्येक जण गुरगुरेल म्हणूनच चांगले शिक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत.याचे स्लो विष हळूहळू येत आहे.
धार्मिक व जातीय प्रेम दाखविणारे चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कधीच आंदोलन करताना दिसणार नाहीत...याचे गुपित जाणून प्रत्येकांनी विचार मंथन करणे काळाची गरज आहे.
श्री.आनंदा आलदर ✒️9765066247