लोकमाता अहिल्याबाई होळकर
लोकमाता अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 25 मे 1725 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी या गावी माणकोजी शिंदे व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला. तर मृत्यू 13 ऑगस्ट 1795 रोजी झाला. मल्हारराव होळकर यांच्या सून व खंडेराव होळकर यांच्या पत्नी अहिल्याबाई यांच्या 70 वर्षाच्या लोकहिताच्या कारभारावर प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करीत आहे... अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त त्यांनी केलेली लोकहिताची कामे शब्दांत मांडताना हजारो का लाखो पानं कमी पडतील.
अहिल्याबाई होळकर यांनी आपला राज्यकारभार करताना माळवा प्रांतात शांतता, सुरक्षितता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर भर दिला होता.जातीय व धार्मिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली होती...जितकी माणसांची काळजी घेतली होती.. तितकीच काळजी वनस्पती, पशुपक्ष्यांची घेतली होती. अहिल्याबाई कुशाग्र बुध्दीमत्तेच्या होत्या.
अहिल्याबाई होळकर यांनी आपला राज्यकारभार करताना सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून त्यांना भयमुक्त व ताट मानेने जगण्यासाठी प्रोत्साहन देऊन अनेक लोकाभिमुख योजना आपल्या राज्यामध्ये अवलंबिल्या. त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना अहिल्याबाई आपल्याच घरातील आहेत असे वाटत होते म्हणून लोकांकडून लोकमाता ही उपाधी मिळाली... त्यांच्या लोकहिताच्या कार्याचा आढावा खालीलप्रमाणे ---
*1) शेती :-*
माझ्या राज्यातील शेतकरी व शेतमजूर बांधव यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल व्हावा यासाठी त्यांनी होतकरू शेतकऱ्यांना जमीन वाटप केली.वृक्षलागवडीसाठी प्रोत्साहन दिले.शिवाय उत्पन्ना नुसार कर आकारणी केली.त्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले.
*2) पाणीपुरवठा :-*
अहिल्याबाई होळकर यांनी शेती व पिण्याच्या पाण्याचे जलव्यवस्थापन अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या राज्यात केलेले दिसून येते.प्राणी,पक्षी व वाटसरू यांचा विचार करून जलव्यवस्थापन करणारी जगातील पहिलीच राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाईंची ओळख असावी. अहिल्याबाईंनी १८ व्या शतकात केलेली जलव्यवस्थापनाची ८० ते ९० टक्के कार्ये आजही सुव्यवस्थित आहेत. हीच त्यांच्या कामाची चोख पावती जगाला पहायला मिळते.विहिरी,तलाव व बारव आज ही मजबूत आहेत.यावरून त्यावेळी केलेल्या कामाचा दर्जा लक्षात येतो.
*3) रस्ते वाहतूक :-*
शेती, उद्योगधंदे व पर्यटनाचा विचार करून लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या राज्यातील मार्ग धार्मिक स्थळांना जोडण्या बरोबर शेती, उद्योगधंदे व व्यापार विकसित व्हावा यासाठी मजबूत रस्ते निर्माण केले.त्या रस्त्यावर ठराविक टप्प्यावर पाणपोई निर्माण केल्या होत्या. विशेष आजही त्या पाणपोई सुस्थितीत पाहायला मिळतात .......
*4) उद्योगधंदे :-*
आपल्या राज्यातील लोकांचे जीवनमान उंचावले जावे.त्यांनी स्वतः चा एक तरी उद्योग उभा करून स्वतः चे आर्थिक जीवन विकसित करण्यासाठी 300 वर्षा पूर्वी निर्माण केलेला महेश्वर हातमाग उद्योग आजही भारतीय उद्योगातील एक ब्रॅंड आहे. आजही तो उद्योग अनेकांना रोजगार उपलब्ध करून देत आहे. त्यांनी निर्माण केलेल्या महेश्वरी साडीचा ब्रॅंड आज भारतापुरताच मर्यादित न राहता जागतीक पातळीवर एक ब्रॅंड आहे.याच माध्यमातून अहिल्याबाईंनी *महिला सक्षमीकरण योजना* आपल्या राज्यामध्ये आणून महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविल्या.
*5) शिक्षण :-*
१८ व्या शतकात शिक्षणापेक्षा तलवारीला जास्त महत्त्व होते.समाजाला शिक्षणाचा गंध ही नव्हता.त्या काळात माणकोजी शिंदे यांनी आपल्या मुलीला लहान वयातच लिहणे व वाचणे घरीच शिकवले.मोडी लिपी त्या लहान वयातच शिकल्या.अनेक ग्रंथाचे वाचन त्यांनी करून वाचनाशिवाय पर्याय नसतो..हे जगाला त्याच वेळी दाखवून दिले होते.तलवारीच्या बळापेक्षा चांगल्या संस्कारीत मनाने जग जिंकता येत हे १८ व्या शतकात अहिल्याबाईंनी दाखवून दिले आहे.
शाहणपण,चातुर्य,मजबूत संघटन , कोणाला ही उपद्रव न पोहचविणे,माती व देशावरील निष्ठा काय असते.साधी राहणी व उच्च विचारसरणी ही अहिल्याबाईंच्या राजकारभारातून शिकता येते.ज्या मनगटात बळ, बुद्धी व चातुर्य असते तो लोकाभिमुख राजा बनू शकतो..हे अहिल्याबाईंनी 18 व्या शतकात दाखवून दिले.
6) *पर्यावरण :-*
अहिल्याबाई होळकर यांच्या हाती राज्यकारभार आला तेव्हा पासून त्यांनी शाश्वत व चिरंतन विकासावर भर दिला होता.पर्यावरणाचे संवर्धन व्हावे.यासाठी त्यांनी पाणी, पशुपक्षी व वनस्पती काळजी घेतली.लोककल्याण डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काम केले.रस्ते,तलाव,विहीर, बारवा व ओसाड व डोंगराळ भागात वड,पिंपळ,चिंच,आंबा व इतर फळांची झाडे लावली शिवाय ती मोठी होईपर्यंत काळजी घेतली.त्यामुळे वाटसरूंना तर सावली व शितलता मिळालीच परंतु पर्यावरण समतोल राखण्यासाठी हातभार ही लागला.यावरून अहिल्याबाईंची दूरदृष्टी व उद्देश किती मोठा होता हे लक्षात येते.
7) *नदी स्वच्छता :-*
आजच्या काळात उद्योगधंद्यामुळे प्रचंड प्रमाणात नद्या प्रदूषित झाल्या आहेत.परंतू १८ व्या शतकात नद्या प्रदूषित होऊ नयेत याची काळजी अहिल्याबाई होळकर यांनी घेतलेली दिसते.अहिल्याबाईंनी नद्यांना पवित्र मानून नद्यातील जलचर व नदीकाठावर प्राणी ,पक्षी व वनस्पती संरक्षित रहावे याची काळजी घेतली.नद्यांचे स्वच्छ पाणी धार्मिक कार्यासाठीच नव्हे तर पिण्यायोग्य व शेतीयोग्य रहावे..इतके पाणी स्वच्छ रहावे यासाठी प्रयत्न केले.नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी नद्यांवर घाट बांधले.त्यांनी बांधलेले घाट पाहिले तर स्त्रियांची किती काळजी लोकमाता घेत होत्या हे लक्षात येते.नदी स्वच्छता बरोबर लोकांची मने स्वच्छ रहावी यासाठी केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे.
8) *स्वच्छ व पारदर्शक कारभार :-*
अहिल्याबाई जगातील एकमेव लोकमाता होऊन गेल्या की त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत विरोधकांचा आर्थिक छळ कधीच केला नाही.लुटालूट करून आपले साम्राज्य वाढवावे असे विचार त्यांच्या मनाला अधिही शिवले सुध्दा नाहीत.
*मी अबला नसून सबला आहे.* हे त्यांनी आपल्या कार्यकर्तत्वातून दाखवून दिले आहे.मल्हार नंतर प्रजा हिच आमची संपत्ती मानून अहिल्याबाईंनी कारभार सुरू केला.जनहिताची अनेक कामे त्यांनी हाती घेऊन त्यांनी पूर्ण केली.मनुष्य ही एकच जात व धर्म अस्तित्वात आहे असे समजून संपूर्ण मानवासाठी त्यांनी कार्य हाती घेतले.आपली प्रजा हीच आपली संपत्ती मानून प्रजाहित लक्षात घेऊन त्यांनी अनेक कामे केली केली.अशा पद्धतीने त्यांनी आपल्या लोकांचे पालकत्व स्वीकारून काम केले.त्यामुळे जगातील एकमेव लोकमाता होऊन गेल्या त्यांच्या कार्यकाळात त्यांनी दुसऱ्याच्या संपत्तीवर लोभ दाखवला नाही.
9) *मंदिरांचा विकास व जीर्णोद्धार :-*
अहिल्याबाई होळकर यांनी इतर धार्मिक लोकांचा कधीच द्वेष केला नाही.त्यांनी अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला.अनेक मंदिरे त्यांना स्वखर्चाने बांधली... त्यांचे उत्कृष्ट नमुने आजही आपण पाहतो आहे.काशी,प्रयाग,पंढरपूर, त्रिंबकेश्वर , केदारनाथ, रामेश्वर , जेजुरी व परळी वैजनाथ काही ठिकाणी धर्मशाळा तर काही ठिकाणी मंदिरे व मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
ज्या ठिकाणी मुस्लिम राजवटी होत्या अशा ठिकाणी सुद्धा अहिल्याबाईच्या धार्मिक चळवळीसाठी विरोध झाला नाही.कारण त्यांचे मन साफ होते. सर्वांना समान न्याय व सत्याला सत्य म्हणण्याचे धाडस अहिल्याबाईमध्ये होते. त्यामुळे अहिल्याबाई सर्व धार्मिक लोकांना हव्याहव्याशा वाटत होत्या.म्हणूनच *तत्वज्ञ राणी म्हणून अहिल्याबाईंचा उल्लेख झाला आहे.*
10) *भयमुक्त जनता :-* अहिल्याबाई होळकर या सर्वसमावेशक राज्यकर्त्यां म्हणून ओळखल्या जातात.त्यांनी कधीच आपला राज्यकारभार पुर्व दूषित ठेवला नाही.सर्वाचा विकास हेच धोरण हाती घेऊन पारदर्शक कारभार काय असतो हे जगाने आदर्श घ्यावा असा राज्यकारभार लोकमाता अहिल्याबाईंना केला. सबका साथ सबका विकास प्रत्यक्ष कामातून दाखवून फक्त जगाला अहिल्याबाईंनी दाखवून दिले.
स्वतः अहिल्याबाई आपल्या सैन्याचे नेतृत्व करत होत्या.जनता दरबार भरवून अहिल्याबाईंनी जनतेचे प्रश्न ऐकून घेऊन कामातून त्यांचे समाधान केले.पुरूषाबरोबर स्त्रियांना ही आर्थिक पाठबळ दिले.
चोर,दरोडेखोर व लूटमार करणाऱ्यांचा बंदोबस्त करून शांतता व सुरक्षितता लोकांमध्ये निर्माण करण्याचे कार्य केले.भ्रष्ट व व्याभिचारी कारभार आपल्या राज्यामध्ये त्यांनी कधीच चालू दिला नाही.भ्रष्टाचारी लोकांना योग्य अशा शिक्षा त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत दिल्या... म्हणून भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमविण्याचे धाडस त्यांच्या कारकिर्दीत कोणीच केले.अशा विचारांची सध्या खूप मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे.भ्रष्ट व व्याभिचारांचे आरोप स्वतः करून आपल्याच पक्षात किंवा सोबत घेऊन कारभार करणारे आपण भरपूर बघतो... परंतु अहिल्याबाईंचा इतिहास वाचण्याची गरज अशा लोकांना आहे.तरच देशात भयमुक्त कारभार होऊ शकतो. *सध्या सर्वांना समान न्याय हीच काळाची गरज आहे.*
शासन व प्रशासन यावर जनहित डोळ्यासमोर ठेवून आपल्या घरापासून समान न्याय कसा दिला जातो.हे जगाला करून दाखविणाऱ्या एकमेव लोकमाता अहिल्याबाई होळकर आहेत.
अशा या पवित्र व जनहिताच्या कार्यामुळे पुण्यश्लोक नल राजानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ठरल्या.त्यांच्या कार्याप्रमाणे कार्य झाले तर जगात धोक्यात कोणीही राहणार नाही हे मात्र नक्की.*३०० जयंती निमित्त विनम्र अभिवादन..*
प्रा.आनंदा आलदर ✒️ 🌱 🌱 9765066247