सातारा प्रतिनिधी तेज न्यूज
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज सातारा येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांशी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी संवाद साधला.
यावेळी पवार म्हणाले की,शाहू महाराज, ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधारा स्वीकारून कर्मवीरांनी आपलं आयुष्य शैक्षणिक विस्तारासाठी झोकून दिलं. कुंभोज आणि काले ही दोन ठिकाण कर्मवीरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी हातात घेतलेल्या कामाच्या शुभारंभाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राचे एक ऐतिहासिक स्थळ होऊन बसले आहे. त्याचे 100 % श्रेय हे आपल्याला कर्मवीरांना द्यावं लागेल.
आज सर्वसामान्य कुटुंबाच्या मुला-मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम अण्णांनी केलं. ज्यांची ऐपत नाही अशा कुटुंबातील मुला-मुलींना तुम्ही कष्ट करा, कमवा आणि शिका, शैक्षणिकदृष्ट्या संपन्न व्हा! या प्रकारची अभिनव योजना ही कर्मवीरांनी सुरू केली. त्यामधून हजारो उच्चशिक्षित विद्यार्थी घडले. अण्णांच्या विचारातून अनेक उत्तम, कर्तृत्ववान नेते तयार करण्याची भूमिका देखील त्यांच्याकडून बजावली गेली. त्यामध्ये प्राध्यापक एन.डी. पाटील, पी.डी. पाटील अनेकांची नाव याठिकाणी घेता येतील. दुसऱ्या बाजूने संस्था उभारणे, संस्था चालवणं, संस्थेतील कमतरता दूर करण्यासाठी समाजाची मदत गोळा करणे यासाठी सुद्धा अण्णांच्या विचारांनी काम करणाऱ्या नेतृत्वाची एक टीमच तयार झाली. यामध्ये शंकरराव काळे, रावसाहेब शिंदे अशा अनेकांची नावे या ठिकाणी घेता येतील.
यावेळी पवार म्हणाले की,समाधान एका गोष्टीचं वाटत की हा विचार घेऊन काम करणारा रयतसेवक आणि रयतप्रेमी यांच्या सहकार्याच्या जोरावर आज देशाची एक महत्त्वाची संस्था म्हणून आपल्या संस्थेचा नावलौकिक झाला. तसेच संस्थेचा विस्तार होऊन लाखो मुलंमुली आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिक्षण घेण्याचं काम करतात. या सगळ्यामागे कर्मवीरांचा विचार हा आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठेवा आहे. आता प्रश्न बदलले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केलं त्या कुटुंबातील मुलामुलींना दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे आधुनिकतेचा स्वीकार करून त्यावर आधारित असलेली शैक्षणिक सुविधा आपल्याला करावी लागेल. त्यासाठी आपले सामुदायिक प्रयत्न आवश्यक आहेत.
यावेळी पवार म्हणाले की,मला आनंद आहे आजच्या या कार्यक्रमात ज्या भावनेने काम करणाऱ्या अनेकांचा सन्मान आपण या ठिकाणी केला. या सगळ्यांची साथ संस्थेला सातत्याने मिळत राहील त्यांच्या मदतीने त्यांच्या साथीने आपण पुढे जाऊ आणि आजची जी गरज आहे त्याची पूर्तता करण्याची काळजी ही आपण निश्चितपणे घेऊ हाच विश्वास हा संस्थेचा अध्यक्ष म्हणून आपल्याला देऊ इच्छितो.असे मत पवार यांनी मांडले.