पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
श्री प्रसाद महाराज अंमळनेरकर यांच्या आशीर्वादाने स्थापन झालेल्या पंढरपूर येथील यशकिर्ती माध्यमिक विद्यालयात आज शनिवार दिनांक 15 जून 2024 रोजी सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांवर मोठ्या उत्साहाने पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रशालेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षिका, स्टाफ यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन तसेच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे अतिशय उत्साहात स्वागत केले. तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका सौ ज्योती बागल मॅडम यांनी औक्षण करून स्वागत केले.
यावेळी विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री जयंत मोडक सर, सचिव डॉक्टर एम. आर. टकले, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सलीमहुसेन बोहरी, यांनी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती बागल मॅडम, व इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक श्री अजीम मुजावर सर यांनी विद्यार्थ्याचे स्वागत केले.
पहिल्याच दिवशी शाळेतील सर्व विद्यार्थी अतिशय आनंदी दिसत होते. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने प्रशालेमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले होते. खरच विद्यार्थ्यांशिवाय शाळाच होऊ शकत नाही. या प्रसंगी प्राथमिक विभागाच्या छोट्या चिमुकल्यांचेही सर्व शिक्षकांनी औक्षण करून स्वागत केले. तसेच प्रशालेतर्फे त्यांना खाऊ वाटप करण्यात आला . सर्व शिक्षक- शिक्षिका यांच्या हस्ते आज प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे खाऊ वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची जबाबदारी आज प्रशालेतील सर्वच शिक्षकांनी घेतली. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.
यावेळी माध्यमिक प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांच्या वतीने उपस्थित सर्व विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी बोलताना माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती बागल मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. आज शिक्षणाला मोठे महत्त्व आहे. आपल्याला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला ज्ञान प्राप्त करावे लागेल. त्यामुळे शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. अशाप्रकारे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन, त्याचबरोबर खेळाचा ही आनंद घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद हे तत्पर आहेत. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शाळेविषयी आणि अभ्यासाविषयी गोडी आणि रुची निर्माण होण्याकरिता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ गौरी अमळनेरकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अजीम मुजावर सर यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या पुष्पवृष्टी आणि स्वागताची पालक वर्गातून कौतुक केले जात असून प्रशालेने राबवलेल्या विविध उपक्रमांचे देखील कौतुक पालकांकडून केले जात आहे.