स्वेरीच्या विद्यार्थ्यांना केले बहुमोल मार्गदर्शन
पंढरपूर प्रतिनिधी
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक विश्वस्त हणमंत बागल यांचे १९८५ चे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, अंधेरी (वेस्ट) मुंबईचे वर्गमित्र असलेले सेवानिवृत्त कर्नल मनोज मुजुमदार, अशोका बिल्डकॉनचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रकल्प) संजय लोंढे, ‘कंटूर्स इंटीरिओ प्रायव्हेट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक पराग एडवणकर, मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या कुसरो वाडीया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे सेवानिवृत्त प्राचार्य विनायक राव, चंद्रकांत गवळी, उद्योगपती शिशिर सदावर्ते, निलेश भावे, संजय तांबोळी यांनी स्वेरीला सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी या सर्व अधिकाऱ्यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंग व डिग्री इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने बहुमोल मार्गदर्शन केले तसेच स्वेरीतील विविध विभागांना प्रत्यक्ष भेट देवून प्रगतीचा आलेख जाणून घेतला.
यावेळी भावी अभियंत्यांना कर्नल मुजुमदार व इतर पदाधिकारी यांनी विशेष मार्गदर्शन केले. स्वेरीचे संस्थापक विश्वस्त एच.एम.बागल यांनी सर्व मित्र व अधिकाऱ्यांचे स्वेरीच्या वतीने स्वागत केले. प्रास्ताविकात संस्थेचे संस्थापक विश्वस्त एच.एम.बागल यांनी १९९८ साली स्वेरीची स्थापना झाली तेंव्हापासून ते आजपर्यंतची स्वेरीची वाटचाल व स्वेरीला मिळालेले उत्तुंग यश याबाबत माहिती दिली. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी व प्राध्यापकवर्ग यांच्या अथक परिश्रमामुळे ‘इवलेसे रोप लावलीये द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या ऊक्तीप्रमाणे आज रौप्य महोत्सवी वर्षात वटवृक्ष झालेल्या स्वेरीच्या दैदिप्यमान यशाची सविस्तर कहाणी ऐकवली. त्यानंतर कर्नल मनोज मुजुमदार यांनी भारतीय सेनेबद्दल आणि त्यांच्या ३३ वर्षांच्या सेवेबद्दल विशेष माहिती दिली.
यावेळी कर्नल मनोज मुजुमदार म्हणाले की, ‘‘देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा एक भाग असलेल्या इंडियन आर्मीमध्ये अभियंत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरत असून अभियंत्यांचे ज्ञान व युक्ती यामुळे संरक्षण व्यवस्था मजबूत होत आहे. भारतीय अभियंत्यांचा मन, मनगट आणि मेंदू शत्रूंना कर्दनकाळ ठरत आहे म्हणून आर्मीमध्ये अभियंत्यांचे विशेष महत्व आहे.’ अरुणाचल मधील डोंगराळ भाग, सियाचीन सारख्या बर्फाळ आणि राजस्थानच्या वाळवंटात जवानांना किती अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यातून सैन्यातील अभियंते कसा मार्ग काढतात याबाबत फोटो, नकाशे आणि उदाहरणांद्वारे माहिती दिली. युद्धाच्या वेळेस कमीत कमी वेळात पूल बांधणे, शत्रूचे जमिनी खालील सुरुंग काढणे, रस्ते बांधणे, आपल्या सिमेवर सुरुंग लावणे, जवानांना पाणी पुरवठा करणे इत्यादी कामांची माहिती दिली. त्यांनी स्वतः केलेली विविध कामे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध शैलीचा आजच्या युद्ध काळात होणारा उपयोग या संदर्भातील उदाहरणांनी सर्व विद्यार्थ्यांची सैन्याबद्दलची उत्कंठा प्रचंड वाढली.
भारतीय सेनेच्या विविध ब्रॅंचेस मध्ये कसा प्रवेश मिळतो, त्यासाठी कसा अभ्यास व प्रयत्न करायचा यावर त्यांनी विशेष भर दिला. सैन्यात अधिकारी होण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्र वाचन, इतिहासाचा अभ्यास, नियमित व्यायाम आणि अभियांत्रिकी विषयांच्या सखोल अभ्यासाचा गुरुमंत्र देखील कर्नल मुजुमदार यांनी दिला. नाशिक मधील अशोका बिल्डकॉनचे संचालक व प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोंढे यांनी ‘मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स’ यावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. ‘युज ऑफ लेटेस्ट टेक्नॉलॉजीज इन इन्फ्रास्ट्रक्चर कन्सलटन्सी’ या कंपनी विषयी माहिती देताना त्यांनी या २५ वर्षात कंपनीने सहा हजार कोटी पर्यंत प्रवास केल्याचे सांगितले.
सध्या या कंपनीने नातेपुते जवळ ३८ दिवसात ब्रीज उभा केला, हा देखील एक विक्रमच आहे तसेच रोड इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कंपनीने विविध मानांकने मिळवली आहेत. आत्तापर्यंत हजारो किमी चे रस्ते तयार केले असून सध्या रु.२१ हजार कोटींची कामे सुरु आहेत. म्हणून सध्याचे विकसित तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ड्रोन टेक्नॉलॉजी’ संबंधी अधिक माहिती देण्याचे आवाहन डॉ.संजय लोंढे यांनी केले. यानंतर त्यांनी स्वेरीच्या प्रगतीचा वाढता आलेख पाहून नियोजनाचे कौतुक केले. ‘कंटूर्स इंटीरिओ प्रा.लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक पराग एडवणकर यांनी ‘मॉडरनायझेशन इन प्लंबिंग कन्स्ट्रक्शन्स’ याबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे आर.आय.टी. इस्लामपूर मधील लायब्ररीचे इंटेरियर आणि पाटण येथे ग्रेनाइट मध्ये त्यांनी केलेल्या भव्य ४० फुट बाय ४० फुट या भव्य स्ट्रक्चरची माहिती दिली. कुसरावो वाडीया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीचे सेवानिवृत्त प्राचार्य विनायक राव यांनी डिप्लोमा इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांना ‘सिव्हील इंजिनिअरिंग मधील आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करताना बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानामुळे होत असलेली प्रगती उदाहरणाद्वारे स्पष्ट करून सिव्हिल इंजिनिअरिंगचा विचार करणे, सामान्य लोकांची मानसिकता, स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची सद्यस्थिती, सिव्हिल इंजिनिअरिंगमधील संधी, स्थापत्य अभियांत्रिकीची गरज व स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर या प्रमुख गोष्टींवर विचार मांडले.
यावेळी या अधिकाऱ्यांच्या सुविद्य पत्नी सौ.स्नेहा भावे, सौ.अंजली लोंढे, सौ.माधवी मुजुमदार, सौ.विजया गवळी, सौ.अपर्णा सदावर्ते, सौ.सपना राव, सौ.मंजुषा तांबोळी, सौ.वैशाली एडवणकर आदी उपस्थित होत्या. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व संस्थापक विश्वस्त नामदेव कागदे, सौ.अलका बागल व डॉ.व्ही.एस.क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले तर संशोधन अधिष्ठाता डॉ.आर.आर.गिड्डे यांनी सर्वांचे आभार मानले.