पंढरपूर प्रतिनिधी
“नवीन राष्ट्रीय धोरणांमध्ये विद्यार्थ्याच्यात कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी सुचविलेले उपक्रम गेल्या अनेक वर्षापासून रयत शिक्षण संस्था सातत्याने राबवीत आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या अभ्यासक्रमात ज्या घटकाचा समावेश केला गेला नाही. अशी कौशल्ये विद्यार्थ्यामध्ये विकसित व्हावीत, यासाठी रयत शिक्षण संस्था नेहमीच आग्रही असते. म्हणून याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. नवीन शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या फायद्याचे राहील.” असे प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अनिल वावरे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यासाठी ‘विद्यार्थी प्रशिक्षण आणि व्यवस्थापकीय विकास कार्यक्रमा’च्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे हे होते.
डॉ. अनिल वावरे पुढे म्हणाले की, “सध्या मार्केट मधील कंपन्या या कांही केवळ नोकऱ्या पुरविणाऱ्या ट्रस्ट नाहीत. त्या केवळ स्वत:च्या कंपन्यांचे हित पाहत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वत:मधील व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय कौशल्ये विकसित केले तर अशांना विविध कंपन्यामध्ये प्राधान्य मिळते. सध्या जग हे मंदिर बनले असून पैसा हाच त्यातील देव बनलेला आहे. त्यामुळे या देवाचे भक्त बनण्याचे उद्दिष्ट कंपन्या करत असतात. भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना फार मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्याकडे ज्ञान असते तर शहरी भागातील विद्यार्थ्याकडे आत्मविश्वास असतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास बाळगला तर कार्पोरेट क्षेत्र सहज काबीज करता येते.”
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन कौशल्याधारित उपक्रम राबवीत असते. अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी हिरीरीने भाग घेतला पाहिजे. एका व्याख्यानातून किमान दहा पुस्तकांचे ज्ञान मिळत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वत:मधील ज्ञान आणि कौशल्ये विकसित करण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केला पाहिजे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बालाजी लोंढे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. प्रशांत नलवडे यांनी करून दिला. या कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, प्रा. डॉ. हनुमंत लोंढे, प्रा. डॉ. रविराज कांबळे, प्रा. कल्याण वाटाणे, प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे, प्रा. डॉ. उमेश साळुंखे, महाविद्यालयातील विविध पदव्युत्तर विभागातील सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यिनी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भारती सुडके यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. धनंजय वाघदरे यांनी केले.