छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी -डॉ.राजकुमार कदम
पंढरपूर प्रतिनिधी
‘मॉ जिजाऊसाहेबांच्या संस्कारात वाढताना बाळराजांनी स्वतःचे साम्राज्य उभे करण्याचे ठरवले आणि पुढे ते कार्य शौर्याने पूर्णत्वास नेले. ऊन-वारा सहन करून स्वराज्य उभे करण्याचे ऐतिहासिक साहस छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत धाडसाने पेलले. त्यांनी अवघड असणारे अनेक गडकोट किल्ले आत्मविश्वासाने जिंकले. यासाठी त्यांनी कोणताही शुभ मुहूर्त पाहिला नाही. केवळ गुप्तहेरांच्या बातम्यावरून ते वेळ निश्चित करत. चांगल्या कार्याला कोणताही मुहूर्त नसतो हे सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्ध केले. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती-जमातींचे मावळे होते आणि कधीही भेदभाव केला न करता सर्वांना समानतेची वागणूक मिळत होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी आहे.’ असे प्रतिपादन बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे डॉ. राजकुमार कदम यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मध्यवर्ती असलेल्या भव्य ओपन एअर थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रतिष्ठानचे डॉ.राजकुमार कदम हे उपस्थित विद्यार्थ्यांसमोर शिवचरित्रातील एक एक पैलू उलगडत होते. विशेष अतिथी म्हणून नूतन हायस्कूल, कोर्टीचे मुख्याध्यापक प्रसाद संत हे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या सुचनेनुसार नवीन प्रार्थना ‘गर्जा महाराष्ट्र माझा ...’ या सुरेल गीताने कार्यक्रमाला सुरवात झाली. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी आपल्या भाषणात ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात उत्तम अभियंता, उत्तम आर्किटेक्ट, फायनान्शियल एक्स्पर्ट, मॅनेंजमेंट गुरु, कार्पोरेट लीडर अशा विविध अष्टपैलू गुणांचा संगम दिसत होता. यश-अपयश हे सर्वस्व नसते हे महाराजांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. म्हणून समाजात स्वतःचे स्थान निर्माण करायचे झाल्यास सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे आणि आत्मविश्वासाने पुढे गेले पाहिजे.’ असे सांगून महाराजांच्या जीवनावर, शौर्यावर, कार्यावर, नेतृत्वावर आणि नियोजनावर प्रकाश टाकून ‘मिळालेल्या यशाने हुरळून जावू नका आणि अपयश आल्यामुळे खचून न जाता पुन्हा आत्मविश्वासाने संघर्ष करत रहा.’ असा कानमंत्र दिला.
पुढे बोलताना प्रमुख पाहुणे डॉ. कदम म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे असे होते की त्यांच्या कर्तृत्वाला मर्यादा नाहीत. दूरदृष्टी, सुसंस्कृतपणा, धाडस असे विविध गुण त्यांच्या कार्यात दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-पातींमधील मावळ्यांना समाविष्ट करून घेतले. त्यांचे धाडस, कल्पकता, नियोजन आणि नेतृत्व पाहता सर्वसामान्य जनतेला महाराज 'आपले' वाटत होते.
त्यामुळे आजही समाजातील सर्व घटकांच्या मनामनात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान हे अबाधित आहे. ते सर्वांना समान वागणूक देऊन वेळप्रसंगी चुकीला कठोर शासनही करायचे. रयतेच्या हितासाठी ते रात्रंदिवस झटत राहिले. महाराज कुशल प्रशासक, धर्मनिष्ठ, शिस्तप्रिय, गुणग्राहक, निष्कपट, उद्योगशील, स्वामिनिष्ठ, कर्तव्यनिष्ठ, कल्पक, स्वाभिमानी, प्रजावत्सल, निर्व्यसनी, अध्यात्मिक, कुटुंबवत्सल आणि मातृभक्त अशा विविध गुणांनी संपन्न होते. सामान्य जनतेला स्वराज्य निर्मितीसाठी प्रेरित करणारे राजे शिवछत्रपती यांना हिंदवी स्वराज्याची भूक होती त्यामुळे रयतेला नेमके काय हवे याची देखील त्यांना जाण होती. माँसाहेबांनी ‘संस्कार आणि संस्कृती’ची शिकवण दिल्यामुळेच शिवरायांचे नेतृत्व आणि कर्तृत्व यांचा विश्वात आदर केला जातो. त्यामुळे आज विश्वातील ३७२ देशात शिवजयंती साजरी केली जाते. 'त्या काळी मावळ्यांनी रक्त सांडले आणि आज स्वेरीच्या मावळ्यांनी ‘रक्तदान’ केले. त्यामुळे स्वेरीतील मावळ्यांचे विशेष कौतुक वाटते' अशा शब्दात डॉ. कदम यांनी कौतुक केले. स्वेरी कॅम्पसमध्ये दिवसभर शिवरायांची पालखी आणि ढोल-ताशा, झांज पथकांसह ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा आवाज घुमत होता. स्वेरीचा संपूर्ण कॅम्पस शिवमय झाला होता. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शिवरायांची महती सांगणारी भाषणे केली. पाहुण्यांच्या हस्ते यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
यावेळी स्वेरीचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त बी.डी.रोंगे, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, कॅम्पसचे इन्चार्ज, बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतीश मांडवे, सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग, इंजिनिअरिंग व फार्मसीचे स्टुडंट कौन्सिलचे सचिव, विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रा.यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.