(भाग - १)
काश्मीरमधील राजघराण्यामध्ये *लक्ष्मणदेवांचा* जन्म झाला. राजपुत्र असल्यामुळे घोड्यावरून रानावनात- दऱ्याडोंगरात भटकणे व शिकार करणे हे लक्ष्मणदेवांचे छंद.धावत जाणाऱ्या हरणाची त्यांनी एकदा शिकार केली. शिकारीनंतर भाल्याच्या टोकाने त्या हरणाचे पोट फाडले तर त्यातून तीन पिल्ले मृतावस्थेत बाहेर पडली. गर्भ धारण केलेल्या एका हरणाला आपण विनाकारण मारले व *माझ्यामुळे आई व तीन बाळांचा मृत्यू झाला,* याचा मनावर खूप मोठा परिणाम होऊन लक्ष्मणदेव विरक्त स्वभावाचे बनले व त्यांनी राजघराण्याचा, तेथील सुख संपत्तीचा व ऐश्वर्याचा त्याग करून वैराग्य धारण केले व *लक्ष्मण बैरागी* म्हणून ते संपूर्ण देशभर तीर्थस्थळांच्या यात्रांसाठी बाहेर पडले.
उत्तर भारतामध्ये मुघलांशी संघर्ष करत असताना *गुरुगोविंदसिंह* यांना यामध्ये अपयश येत असल्याचे लक्षात येताच दक्षिण भारतातून काही मदत मिळविण्यासाठी *नांदेड* या ठिकाणी आलेल्या गुरुगोविंदसिंह यांची गोदावरी नदीच्या काठी लक्ष्मण बैरागी यांच्याशी भेट झाली. गुरुगोविंदसिंह यांनी उत्तरेतील आपल्या राज्याची व शीख संप्रदायाची होणारी परवड लक्ष्मण बैरागी यांना सांगितली. यावर *तुम्ही आता काळजी करू नका. मी स्वतः उत्तरेत जाऊन शीख अनुयायांना एकत्र करून सैन्य उभा करेन व मुघलांविरुद्ध लढाई करून पुन्हा राज्य स्थापन करेन. मी आपला बंदा (सेवक) आहे, मला फक्त तुम्ही आदेश द्या.* असे लक्ष्मण बैरागींनी गुरुगोविंदसिंह यांना सांगितले. नांदेडच्या ज्या घाटावर हा संवाद झाला, त्या घाटाला *बंदा बैरागी घाट* असे नाव पडले व तेव्हापासून *लक्ष्मण बैरागी हे बंदा बैरागी* म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरुगोविंदसिंह यांनी नांदेड याच ठिकाणी आपल्या धर्मग्रंथास म्हणजेच *ग्रंथसाहिबास गुरुच्या गादीवर बसविले व शीख संप्रदायातील मनुष्य देहधारी गुरु संपवून आपल्या ग्रंथालाच गुरु केले, त्यामुळेच गुरु ग्रंथसाहिब* म्हणून आपण या ग्रंथाला ओळखतो.
ही घटनादेखील पंजाबमध्ये जाऊन बंदा बैरागी यांनी शीख अनुयायांना सांगितली व वैराग्यवृत्ती बाजूला ठेवून अथक परिश्रमाने बंदा बैरागी यांनी *सशस्त्र सैन्य उभे केले व मुघलांविरुद्ध संघर्ष केला.* सर्व शिख अनुयायांना *संघटित* केले. शिखांचा संप्रदाय गुरुगोविंदसिंहानंतर तुटू न देता त्याला *सुव्यवस्थित रूप* देण्याचे काम केले. परंतु मुघलांच्या विरुद्ध संघर्षात अखेर बंदा बैरागी यांना *आपले प्राण गमवावे लागले.* अत्यंत हाल-हाल करून व शेवटी हत्तीच्या पायाखाली तुडवून बंदा बैरागी यांना मारण्यात आले. देशाच्या इतिहासात बंदा बैरागी यांचे नाव अजरामर झाले. धर्म - संस्कृती व देश याच्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या लक्ष्मणदेव यांच्यासारख्या व्यक्तींना खरोखरच आपण या जन्मात काय करायला हवे याचे ज्ञान झाले होते, म्हणूनच त्यांनी वेळ येईल त्याप्रमाणे भूमिका निभावल्या. खरंच यांना जीवन कळले होते.
- डॉ.श्री.सचिन लादे, पंढरपूर.