*भाळवणी जि.प.गटात नेते एकीकडे,कार्यकर्ते दुसरीकडे तर नाराज मतदार तिसरीकडे*
भाळवणी प्रतिनिधी,प्रशांत माळवदे
पंढरपूर तालुकयातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील नेते एकीकडे,कार्यकर्ते दुसरीकडे तर नाराज मतदार तिसरीकडे अशी अवस्था झालेले आहे.
भाळवणी गटात सुधाकरपंत परिचारक,कल्याण काळे व शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचे या गटावर कायम वर्चस्व राहिलेले आहे.या गटात परिचारक गटाच्या सौ.वाघमोडे जिल्हा परिषदेच्या विदयमान सदस्या आहेत.तर सुपलीतील देवकुळे हे पंचायत समिती सदस्य आहेत.भाळवणी पंचायत समिती गटाचे शिवसेनेचे विदयमान सदस्य संभाजी शिंदे आहेत.हि सर्व मंडळी माढा लोकसभा मतदार संघाचे भाजप,शिवसेना,रिपांई व मित्रपक्षाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निबांळकर यांचा प्रचार करीत आहेत.तसेच या भागात जुने भाजपा व शिवसेनेचे कार्यकर्ते असून त्यांना सहभागी करून घेतले जात नसल्यांची चर्चा केली जात आहे.त्यामुळे प्रचार कोणी करायचा म्हणून सर्व गप्पच असल्याचे दिसत आहे.अजून प्रचार कार्यालयाचा पत्ताच नाही.
तर भाळवणी परिसरातील युवा पिढी राष्ट्रवादीचे पंढरपूर तालुकाध्यक्ष दिपक पवार,सहकारशिरोमणीचे माजी संचालक ईस्माईल मुलाणी,समाजसेवक गोरख लिंगे,नवनाथ शिंदे,कांबळे,संजय बाबर,नवाजशरीफ सय्यद,एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष निहाल शेख ही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व मित्रपक्षाचे उमेदवार संजय शिंदे यांचा प्रचार करीत आहेत.येथील शिवतीर्थावर संजय शिंदे यांची प्रचार सभा घेऊन चांगल्या वातावरणाची निर्मिती केली आहे.युवकामध्ये उत्साह वाढत चालेला दिसून येत आहे.युवकांना सन्मान दिला जात आहे.युवकांना प्रचार कार्यालय सुरू केलेले आहे.
भाळवणी व परिसरात निरा कालव्याचे पाणी न आल्यामुळे ग्रामस्थांनी रस्ता रोको केला होता.त्यानंतर मतदानावर बहिष्कार टाकला होता.त्यामुळे निवडणूकीविषयी मतदारात नाराजी निर्माण झालेली आहे.दरवर्षी उन्हाळयात पाणी मिळण्यासाठी या भागातील शेतक-यांना आंदोलन करावे लागते.या पाणी प्रश्नावर कोणतेही सरकार कायमस्वरूपी तोडगा काढत नाही.किंवा पाणी मिळण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही.
येथील झालेल्या प्रचार सभेत उमेदवार संजय शिंदे यांनी पाणी प्रश्नासाठी खासदारकी पणाला लावणार असल्याचे सांगितले आहे.तर वाडी कुरोली येथील निंबाळकर यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडणार असल्याचे सांगितले.पण सभे दिवशी सकाळी निरा कालव्याला पाणी सोडण्यात आले ते ही कालवा ओला होण्या एेवढे.अगोदरच या भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे.पाणी पिण्यासाठी नाही व जनावरांना चारा नाही.कालव्याला पाणी सोडले ते ही पुरेशा दाबाने नाही.त्यामुळे या भागातील प्रश्न सोडविण्याकडे कोणताही लोकप्रतिनिधी ,शासकीय आधिकारी लक्ष देत नाहीत.कोणत्याही पक्षाची मंडळी सर्व सामान्य मतदाराचे प्रश्न सोडवित नाहीत.त्यामुळे मतदारात नाराजी झालेली आहे.याबाबत वरिष्ठ नेतेमंडळीनी लक्ष घालून पाणी प्रश्न व अडचणी सोडवाव्यात अशी मागणी मतदारारडून केली जात आहे.
वरवर एकतर्फी वाटणारी निवडणूकी शेवटी मात्र नेत्याचा घाम काढणार असे चित्र दिसत आहे.