तारापूर प्रतिनिधी तेज न्यूज
सामाजिक, शैक्षणिक व बौद्धिक चळवळींना बळ देणाऱ्या पंचशील प्रतिष्ठान, तारापूर यांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्याच्या दृष्टीने तसेच संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठक शुक्रवार दि. 06 मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार असून ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, तारापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पंचशील प्रतिष्ठानचे सर्व सभासद, कार्यकर्ते तसेच परिसरातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्याचा पंचशील प्रतिष्ठानचा मानस आहे. या अनुषंगाने जयंती उत्सवाचे नियोजन, विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम, समाजातील युवकांचा सहभाग वाढवणे, तसेच शिक्षण, संघटन आणि संघर्ष या विचारांचा प्रसार करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे.
तसेच संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि समाजकार्याला गती देण्यासाठी पंचशील प्रतिष्ठानच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्याबाबतही या बैठकीत विचारमंथन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समाजातील विविध घटकांना एकत्र आणून बौद्ध व आंबेडकरी चळवळीचे विचार अधिक व्यापक पद्धतीने समाजापर्यंत पोहोचवण्याचा संस्थेचा प्रयत्न असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक आयोजित करण्यात आली असून, समाजातील सर्व बांधवांनी उपस्थित राहून बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांची रूपरेषा, नियोजन समित्या तसेच विविध जबाबदाऱ्यांचे वाटप याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.


