अहेरी प्रतिनिधी तेज न्यूज
अहेरी शहरात आज दुपारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक जाणीव जपत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या उद्घाटक अर्चनाताई कावळे होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमास रामचंद्रजी गुरनुले (सेवा निवृत्त शिक्षक), अशोक निकुरे, सागर गारुत्रे, रियाजभाई शेख (जिल्हा कार्याध्यक्ष, गडचिरोली) तसेच नामदेवजी गुरनुले (सेवा निवृत्त नायब तहसीलदार) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी रियाजभाई शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर दोन शब्दांत सखोल प्रकाश टाकला. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता व न्यायासाठी केलेले संघर्ष आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर चालण्याचा आणि समाजात शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम शांततापूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक गुरुणुले यांनी केले. त्यांनी कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावीपणे पार पाडला.

