सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
लोकशाही अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रल या सामाजिक संस्थेच्या वतीने आज चार पुतळा पार्क चौक व सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रॅक येथे मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांसह सर्व वयोगटातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. मतदान हा केवळ अधिकार नसून देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा कणा असून प्रत्येक पात्र नागरिकाने निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी उपस्थित नागरिकांनी सामूहिकरित्या “मी भारताचा जबाबदार नागरिक म्हणून जात, धर्म, पैसा अथवा दबावाला बळी न पडता योग्य व पात्र उमेदवारास मतदान करीन आणि लोकशाही अधिक सक्षम करीन” अशी मतदान शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अनेक नागरिकांनी मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या जनजागृती मोहिमेत भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलचे सर्व संचालक मंडळ, व्हिजन सदस्य व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुशील महिंद्रकर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून मतदान न केल्यास आपल्या भविष्याचा निर्णय इतरांच्या हाती जातो, त्यामुळे प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी संस्थेचे सचिव इंजि. सागर पुकाळे यांनी उपस्थित नागरिक, सदस्य व सहकाऱ्यांचे आभार मानले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून येणाऱ्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


