भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दि १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. ०२ ऑक्टोंबर, २०२५ या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने तालुक्यातील भाळवणी याठिकाणी तहसिलदार सचिन लंगुटे , सर्कल अधिकारी गणेश साठे यांचे मार्गदर्शनातून,तलाठी एस एन शिनगारे यांनी गाव परिसरातील पाणंद रस्त्याची प्राथमिक पाहणी केली.
दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर २०२५ याकाळात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात तालुक्यातील सर्व गावांमध्ये ७/१२ वाचन करण्यात येणार आहे. गाव तिथे स्मशानभूमी अभियान अंतर्गत ज्याठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तेथे खाजगी जागा अथवा शासकीय जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच शासकीय जमीन बँकांचे डिजिटलायझेशन, विविध जातीचे प्रलंबीत प्रमाणपत्र वाटप करणे, कुणबी जातीच्या नोंदी शोधणे, अनुकंपा भरतीची कार्यवाही पूर्ण एकट्या महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्यासाठी विविध दाखले, व्हीजेएनटी जमातीसाठी विविध प्रकारचे दाखले देण्यासाठी शिबीराचे आयोजन, पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे, रस्ते अदालत आयोजन करून शेत रस्त्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, कुलठल्याही प्रकारचा वाद नाही अशा रस्त्यांची नोंद इतर अधिकारात घेणे तसेच पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे, तृतीयपंथीयोजनांचा लाभ देणे, महा ई सेवा केंद्र बंद असलेल्या ठिकाणी नवीन केंद्र वाटप करणे, आयुषमान भारत कार्ड वाटपासाठी शिबीराचे आयोजन करणे असे विविध कामकाज करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने भाळवणी याठिकाणी तलाठी एस एन शिनगारे यांनी सरपंच रणजीत जाधव, ग्रामविकास अधिकारी डी एम वाघमारे, पांडूरंग शिंदे,अंकुश शिंदे, चौगुले, व्यंकटेश महाजन व शेतकरी यांना सोबत घेऊन परिसरातील विवादित पाणंद रस्ते याची प्राथमिक पाहणी केली. या सेवा पंधरवाड़ा काळात भाळवणी गावातील जास्तीत-जास्त नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदवून विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन तलाठी एस एन शिनगारे यांनी केले आहे.

