मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज
विशेष सरकारी वकील आणि राज्यसभेचे नवोदित सदस्य उज्ज्वल निकम यांनी अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान 1993 मध्ये झालेला मुंबई बॉम्बस्फोट आणि बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे. मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की जर संजय दत्तने त्यावेळी तोंड उघडले असते तर मुंबई शहर बॉम्बस्फोटांनी हादरले नसते आणि 267 लोकांचा जीव गेला नसता.
1993 च्या बॉम्बस्फोटांशिवाय अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम केलेले उज्ज्वल निकम यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, "अबू सालेम बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी संजय दत्तच्या घरी शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन गेला होता. अभिनेत्याने त्यातून काही हँडग्रेनेड आणि बंदुका घेतल्या होत्या, त्यावेळी त्याने फक्त AK-47बंदूक स्वतःकडे ठेवलेली आणि बाकी सर्व काही परत केल्या होत्या. जर संजय दत्तने त्या शस्त्रांनी भरलेल्या व्हॅनबद्दल पोलिसांना तेव्हाच माहिती दिली असती तर पोलिसांनी तपास केला असता आणि 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेला बॉम्बस्फोट रोखता आला असता.
निकम पुढे म्हणाले, "पोलिसांना माहिती न देणे हेच एवढा मोठा दहशतवादी हल्ला होण्यामागील कारण होते. अभिनेत्याने बाळगलेल्या मौनामुळे अनेकांचे जीव गेले." बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्तला टाडा अंतर्गत अटक करण्यात आली होती.
नंतर त्याला फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आले आणि पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. अभिनेत्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात ही शिक्षा पूर्ण केली. 2016 मध्ये त्याची सुटका झाली.