पुणे प्रतिनिधी तेज न्यूज
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी विभागाच्या आढावा बैठकीनंतर भाजपचे मंत्री अशोक उईके यांनी हिंदी भाषेवरून महत्त्वपूर्ण विधान केले. मला हिंदी येत नसल्यामुळे मी फक्त मराठीतच बोलणार, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पहिलीपासून हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर या विधानातून मंत्री उईके यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी आदिवासी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री अशोक वुईके बोलत होते. त्यावेळी आमदार बापू पठारे देखील उपस्थित होते. अशोक उईके यांनी हिंदी भाषेबद्दल आपले विचार स्पष्टपणे मांडले. "माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला आहे. माझी आई निरक्षर होती; पण तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले. मला तीच भाषा येते. मला हिंदी येत नाही. हिंदी माध्यमांशी मी हिंदीत बोलणार नाही," असं उईके यांनी म्हटलं.
दरम्यान, अशोक उईके यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार आहे. कारण विरोधी पक्षांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. अशातच महायुती सरकारमधील मंत्र्यानेही घरचा आहेर दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सरकारची कोंडी होण्याची शक्यता आहे.