मायणी प्रतिनिधी विशाल चव्हाण तेज न्यूज
सातारा जिल्ह्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या मायणी ता. खटाव गावामध्ये पोलीस स्टेशन व्हावे, पोलीस स्टेशन होईपर्यंत कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या वाढवावी, तसेच सततच्या चोऱ्या, घरफोड्या व शाळा महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओंचा बंदोबस्त व्हावा या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी मोर्चा काढून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
गेली अनेक दशके खटाव तालुक्यात मायणी येथे पोलीस स्टेशन व्हावे व पोलीस स्टेशन होण्यासाठी लागणाऱ्या विविध प्रस्ताव प्रत्येक वेळी शासन दरबारी पाठवण्यात येत आहेत मात्र प्रत्येक वेळी कोणती ना कोणती त्रुटी काढून प्रस्ताव प्रलंबित राहत आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारी परिसरात वाढू लागली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे व्यापारी, ग्रामस्थ, विद्यार्थी, विद्यार्थिनी व प्रवासी वर्ग मेटाकोटीला आला आहे.
त्यामुळे सोमवारी येथील विविध राजकीय संघटना ,व्यापारी, सामाजिक संघटना व पत्रकार मित्रांच्या संयुक्त विद्यमानाने येथील शिंदेवाडी रोड पासून मोर्चास सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा नवी पेठ, उभी पेठ, चावडी चौक, मुख्य बस स्थानक , चांदणी चौक मार्गे पोलीस दूरक्षेत्रामध्ये नेण्यात आला. तदनंतर या मोर्चाचे रूपांतर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणात करण्यात आले या लाक्षणिक उपोषणा मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे मायणी अध्यक्ष डॉक्टर विकास देशमुख, अजिंक्य उद्योग समूहाचे सर्वेसर्वा हिम्मत देशमुख ,ग्रामपंचायत प्रतिनिधी हेमंत जाधव,खटावभाजपा प्रवक्ता विशाल चव्हाण, अझरुद्दीन नदाफ, सुशांत गरवारे, प्रकाश सुरमुख ,महेश जाधव, संतोष सुरमुख यांनी मनोगत व्यक्त केले.
मोर्चा व उपोषणा स्थळी मायणी पोलीस स्टेशन व्हावे, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, घडलेल्या चोऱ्यांचा तपास व्हावा, वाढत्या चोऱ्या रोखाव्यात,रोड रोमिओ बंदोबस्त करावा व भयमुक्त वातावरण व्हावे अशा विविध मागण्या करून सदर मागण्यांचे निवेदन सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील, मायणी गावचे पोलीस पाटील प्रशांत कोळी यांना देण्यात आले.
मायणी पोलीस स्टेशन होण्यासाठी मायणीसह परिसरातील सर्व ग्रामपंचायतीकडून नव्याने प्रस्ताव तयार करून पाठवलेला आहे, तसेच पोलीस स्टेशन होण्यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू आहेत त्यामुळे लवकरच मायणी येथे पोलीस स्टेशन होणार आहे. सदरच्या आपल्या मागण्यांचे निवेदन लवकरच वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात येईल ,तसेच आपण निवेदनाद्वारे केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू.
विक्रांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक