पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यात दि. १३ ते २१ मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे १५४ शेतकऱ्यांचे नजरअंदाज ९३.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, केळी, डाळींब, कांदा, शेवगा आदी पिकांचा समावेश आहे. तसेच एकलासपुर येथे तीन घरांची पडझड झाली असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी दिली.
तालुक्यात दिनांक १३, १५ व १९ मे २०२५ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तावशी, तुंगत, बाभुळगाव, आढीव, रोपळे, शेटफळ, खेडभाळवणी, गादेगाव, शिरगाव, कोर्टी, बोहाळी आदी गावांतील १५४ शेतकऱ्यांचे ९३.३७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे एकलासपुर येथील ३ घरांची पडझड होवून नुकसान झाले असून, शिरगाव येथे अंगावर झाड पडून १ गाय मयत झाली आहे. याबाबतचे पंचनामे करण्याचे कामकाज सुरु असल्याची माहिती तहसिलदार लंगुटे यांनी दिली.
तसेच दिनांक ३१ मे २०२५ पर्यंत अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वा-यांमुळे होणा-या नुकसानीबाबतचे पंचनामे करुन दिनांक १ जून २०२५ पर्यंत कृषीसहाय्यक, ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिल कार्यालयाकडून देण्यात आले असून, तालुक्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबतचा एकत्रित अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयमार्फत शासनास सादर करण्यात येईल.असेही तहसिलदार सचिन लंगुटे यांनी सांगितले.