यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या आवश्यक सर्व सोयी-सुविधेला प्राधान्य द्यावे
पालखी मार्ग, तळांवर शौचालय, हिरकणी कक्ष, चेजिंग रुमची संख्या वाढवावी
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 06 जुलै 2025 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 30 जून तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 01 जुलै 2025 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे तसेच पालखी मार्गावरील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिल्या.
आषाढी यात्रेच्या पुर्वतयारीबाबत श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्त निवास, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, प्रांताधिकारी सचिन इथापे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशिल संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, पोलीस निरिक्षक विश्वजीत घोडके आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करावीत तसेच पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. भंडीशेगांव येथील जलसंपदा विभागाच्या जागेत मोडकळीस आलेल्या इमारती असून त्या इमारती पाडण्यासाठी पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाने आवश्यक ती कार्यवाही तत्काळ करावी. पालखी मार्ग व पालखी तळांवर शौचालय, हिरकणी कक्ष, चेजींग रुम यांची संख्या वाढवावी. पिराच्या कुरोली येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामांबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावा. आषाढी यात्रा कालावधीत एस.टी महामंडाळाकडून तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येतात त्या ठिकाणी प्रवाशांसाठी मुबलक प्रमाणात शौचालय, स्नानगृहाची व्यवस्था करावी तसेच बसस्थानक स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी. तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी आवश्यक निविदा प्रक्रिया प्राधान्याने पुर्ण कराव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी यावेळी दिल्या.
तसेच पालखी सोहळा प्रमुखांनी पालखी मार्गावर व पालखी तळांवर सोहळ्यासह भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी काही सुचना मांडल्या होत्या त्या सुचनांची दखल घेवून तातडीने कामे पुर्ण करावीत असेही जिल्हाधिकारी आशिर्वाद यांनी यावेळी सांगितले.