स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूव्ह २ के २५’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न
पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
‘सोशल मिडीया हा आपसात संवाद वाढविण्यासाठी असून सध्या याचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे आणि यामुळे गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे. अशावेळी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ कामापुरताच करावा. अनोळखी व्यक्तीशी ओळख वाढवू नये, त्याला कोणतीही माहिती देवू नये. अनोळखी व्यक्तीला ओटीपी देवू नये तसेच कोणत्याही मोहाला बळी पडू नये, आपले डाक्युमेंटस् अकारण कुणालाही शेअर करू नयेत अथवा पोस्ट करू नयेत. अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने सोशल मिडीयाचा वापर कमीत कमी करावा.’ असे आवाहन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या विभागामध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘चक्रव्यूव्ह २ के २५’ या एकदिवशीय तांत्रिक संशोधनपर कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडणे हे मार्गदर्शन करत होते. दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात आयकॉनचे उपाध्यक्ष ओम गाढवे यांनी ‘चक्रव्यूव्ह २ के २५’ या तांत्रिक स्पर्धेचे स्वरूप, नियमावली, सहभागी विद्यार्थ्यांना व विजेत्यांना दिल्या जाणाऱ्या बक्षिसांचे स्वरूप या संबंधित बाबी स्पष्ट केल्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी.एम. पवार यांनी ‘संशोधन आणि तंत्रज्ञान’ याबद्धल सविस्तर माहिती दिली. पुढे बोलताना प्रमुख पाहुणे उपनिरीक्षक विक्रम वडणे म्हणाले की, ‘सध्या होतकरू युवकांची देशाला गरज असून अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्रता, अभ्यासक्रम आदी संबंधित शंका विचारल्या असता उपनिरीक्षक वडणे यांनी समर्पक उत्तरे दिली. यामध्ये ‘चक्रव्यूव्ह २ के २५’ या राज्यस्तरीय स्पर्धेत कोडींग इव्हेंट्स मध्ये इतर राज्यातील कॉलेजच्या विद्यार्थी- स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना एकूण रोख रु. २६ हजार, स्मृतीचिन्ह व प्रमाणपपत्र अशा स्वरूपाची बक्षिसे देण्यात आली.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आयकॉन प्रतिनिधी अथर्व माळवदे यांच्यासह विभागातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. समन्वयक म्हणून प्रा. पी. डी. माने व प्रा. के. आय. चव्हाण यांनी काम पाहिले. या उपक्रमात महाराष्ट्र व आसपासच्या राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास ४२० विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, विभागप्रमुख डॉ. एस. पी. पवार, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. के.बी. पाटील, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. एम.एस. मठपती, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वितरीत करण्यात आली. विद्यार्थिनी सचिवा सोनाली करवीर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.