पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथे आयोजित ज्ञानवर्धिनी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात समाजरत्न जैनुद्दीन मुलाणी यांना सामाजिक कार्यातील विशेष योगदानाबद्दल 'समाजगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पुणे विभागीय मा. शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमास धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, प्रा. डॉ. दादासाहेब साळुंखे, कृष्णा-गोदावरीचे संचालक संदीप नळंदवार, युवा नेते सागर पाटील, विठ्ठल सहकारी संस्थेचे संचालक धनंजय काळे, समाधान गाजरे तसेच या कार्यक्रमाचे संयोजक राजेश पवार, अंकुश गाजरे, हेमंत पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सचिव कल्याणराव शिंदे, पंढरपूर शाखा अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, प्रा. शिवाजी वाघमारे, बाबुसेठ पांडकर, सरपंच अनिल गाजरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मा. आ. सावंत म्हणाले, जैनुद्दीन मुलाणी यांचे निरपेक्ष सामाजिक कार्य तरूणांसाठी प्रेरणादायी आहे. जैनुद्दीन मुलाणी यांनी गेल्या २५ ते ३० वर्षांपासून समाजसेवेच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांनी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहिमा, स्त्री भ्रूणहत्या एक सामाजिक समस्या जनजागृती अभियान, आरोग्य शिबिरे, तसेच उपेक्षित व दुर्बल मुलांसाठी शैक्षणिक मदत अशा अनेक उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य केले आहे. त्यांच्या या निरपेक्ष व निस्वार्थ सेवेस विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी वेळोवेळी गौरवले आहे.
अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेले जैनुद्दीन मुलाणी यांनी कधीही हार न मानता समाजासाठी कार्य करत राहिले. 'आपण काहीही असलो तरी दुसऱ्यांसाठी काही करू शकतो' ही भावना त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिली. आज ते साप्ताहिक 'युवा राष्ट्रचेतना' चे संपादक असून, नवतरुणांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
पुरस्कार प्रदान करताना मा. आ. दत्तात्रय सावंत पुढे म्हणाले, मुलाणी यांचे कार्य हे तरुणांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे. त्यांनी परिस्थितीवर मात करत समाजकार्यात आपले योगदान दिले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.
हा सन्मान केवळ एका व्यक्तीचा नाही तर समाजासाठी झटणाऱ्या प्रत्येक निरपेक्ष सेवकाचा सन्मान आहे, अशा शब्दांत त्यांचा गौरव करण्यात आला.