भाळवणी प्रतिनिधी तेज न्यूज
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील शेतकरी सविता दादासो देशमुख यांना वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट चा ऊसभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
ऊस व साखर उद्योगाची अग्रणी संस्था म्हणून नावाजलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आपणाला 'ऊस भूषण' पुरस्कार देऊन आपला सत्कार गुरूवार दि. २३ जानेवारी, २०२५ रोजी करण्याचे योजिले आहे. तरी आपण या सत्कार कार्यक्रमास आपल्या यजमानां समवेत सकाळी ठीक ०९.०० वाजता उपस्थित रहावे, असे आग्रहाचे निमंत्रण मी पत्राद्वारे आपणास देत असल्याची माहिती संचालक संभाजी कडू पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्राची प्रति हेक्टरी ऊस उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सदैव प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता संस्थेतर्फे सन १९९६ पासून जास्तीत जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला 'ऊस भूषण' पुरस्कार देऊन पुरस्कृत करण्यात येते. सन २०२३-२४ या गळीत हंगामात आपल्या अथक परिश्रमाने आपण खोडवा हंगामात प्रति हेक्टर २२२.८६ टन ऊसाचे मध्य विभागात विक्रमी उत्पादन घेऊन 'ऊस भूषण' या मानाच्या पुरस्कारास पात्र झाला आहात. आपण केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असून महाराष्ट्राची मान जागतिक स्तरावर उंचावणारी आहे.अशी माहिती कडू पाटील यांनी दिली आहे.
सविता देशमुख या श्री पांडुरंग साखर कारखान्याच्या सभासद आहेत.हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक व सर्व संचालक मंडळ,अधिकारी,शेतकरी यांनी अभिनंदन केले आहे.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सविता दादासो देशमुख यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.