सोलापूर प्रतिनिधी तेज न्यूज
जलसंपदा विभागामार्फत शेती सिंचनासाठी उजनी धरणातून आज ४ जानेवारीसह, १ मार्च आणि १ एप्रिल अशा तीनवेळा पाण्याची आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिले आवर्तन १४.१७ टीएमसी एवढे राहणार आहे.
उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी सोलापुरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या समितीची बैठक एरव्ही पुण्यात होते. परंतु यंदा प्रथमच ही बैठक सोलापुरात झाली. येत्या फेब्रुवारीमध्ये या समितीची बैठक पुन्हा घेऊन पाण्याचे आवर्तन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.