पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर येथील चार्जिंग स्टेशनचे काम लवकर पुर्ण करून ते सुरु करावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने विभाग नियंत्रकाकडे पत्राद्वारे केली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळाच्या येथील चार्जिंग स्टेशनचे काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने येथून इलेक्ट्रीक बस धावु शकत नाहीत. आषाढी यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ होणार असेही सांगितले जात होते. ते न होता मागील आठ महिन्यांपासून हे काम सुरू आहे तथापि अद्यापही ते पूर्ण झालेले नाही ही वस्तुस्थिती आहे.
सोलापूर जिल्ह्यात सोलापूरशिवाय पंढरपूर आणि मंगळवेढा या दोनच आगारात चार्जिंग स्टेशनची उभारणी चालू आहे.मात्र दोन्ही ठिकाणची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे सोलापूर ते पुणे या मार्गावरच इलेक्ट्रीक बस धावत आहेत.जिल्हयातील इतर दोन्ही ठिकाणची कामे पुर्ण न झाल्याने देशातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर येथील आगार व भाविक इलेक्ट्रीक बस सेवेपासून वंचित आहेत.
त्यामुळे चार्जिंग स्टेशनची उभारणी गतीने पुर्ण करुन त्याची चाचणी लवकरच घेऊन प्रवासी भाविकांना इलेक्ट्रीक बस सेवा उपलब्ध होईल अशी अपेक्षा ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते, प्रांत सदस्य सुभाष सरदेशमुख,जिल्हा संघटक दीपक इरकल, जिल्हा सचिव सुहास निकते,तालुका अध्यक्ष विनय उपाध्ये उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे, संघटक महेश भोसले,प्रा.धनंजय पंधे,सदस्य अण्णा ऐतवाडकर,सागर शिंदे सतिश निपाणकर, यांनी व्यक्त केली आहे.