खंडोबा / मल्हारी मार्तंड भाग 2
खंडोबाच्या उपासना पद्धतीमध्ये देवाची पूजा, अभिषेक, नैवेद्य याचबरोबर नवस फेढीसाठी देवाला मौल्यवान वस्तू अर्पण करणे,दीपमाळ बांधणे,मंदिराचा निर्णय पायऱ्या बांधणे, अन्नदान करणे, वारी मागणे, खेटे घालणे ,लंगर तोडणे, कान टोचणे, भंडारा खोबरे उधळणे,तळी भरणे, पशुवध मेंढी वाहणे यासारख्या सौम्य उपासना पद्धती आज सर्वत्र रूढ आहे.
*वावर जत्रा- नवविवाहितांनी एखाद्या प्रख्यात खंडोबा क्षेत्र दर्शनाला जाऊन वेशीत शिरल्यानंतर पतीने पत्नीला पाच पायऱ्या चढेपर्यंत उचलून घेणे. ( अर्थात पतीपेक्षा पत्नी अधिक वजनदार असेल तर पतीने पत्नीचा हात आपल्या हातात घेऊन पाच पायऱ्या चढल्या तरी चालते). लोकगीतांमध्ये खंडोबाच्या एकूण पाच बायकांचा उल्लेख येतो. सुरुवातीला नमस्कार करून या पाच पायऱ्या पत्नीला उचलून घेऊन चालणे याचाच अर्थ असा की उभयता नव पतीपत्नीचा खंडोबाला त्याच्या पाच बायकांसह नमस्कार असो ,हे या विधी मागचे लोक तत्व आहे .मंदिरात जोडीने देवाचे दर्शन घेणे ,अभिषेक करणे ,देवाच्या नावाने देवासमोर वाटीभर तेल जाळणे ,मंदिरासमोरील दगडी अथवा पितळी कासवावर भंडारा खोबरे उधळणे, तळी भंडाराचा विधी करून घेणे ,शक्य असल्यास अन्नदान करणे किंवा गोरगरीब भिकारी अपंगांना धनधान्य दान करणे हा संपूर्ण विधी नवदांपत्यांनी करणे. म्हणजेच वावर जत्रा करणे होय हा एक महत्त्वाचा धार्मिक संकेत आहे.
*जागरण घालणे -लग्न सारख्या संस्कारानंतर किंवा संस्काराआधी देवदर्शनाला जाणे आणि वाघ्या मुरळ्यांचे जागरण घालणे. हा कुलाचार खंडोबाच्या सर्व कुलाचारांमध्ये फार महत्त्वाचा मानला जातो.
*रंगभोग रंगभोगाचे दोन प्रकार आहेत
अंगभोग- देवाच्या अंगाला चंदनाची उटी लावून दही भाताने पूजा मांडणे म्हणजेच देवाचा अंगभोग आहे.
रंगभोग- भंडारा खोबरे उधळून नाच गाणे करून देवाची सेवा केली जाते. याला देवाचे रंगभोक असे म्हणतात अशी सेवा वाघ्या मुरळी आणि इतर लोक कलावंत करतात.
*लंगर तोडणे- दगडास जाड साखर दंड बांधून त्याच्यावर भंडारा खोबरे उधळून तो हिसके देऊन तोडण्यात येतो त्याला लंगर तोडणे असे म्हणतात. आजकाल बऱ्याच ठिकाणी साखळदंड हलका आणि छोटा वापरून हा विधी केला जातो .कर्नाटकात मात्र आजही मोठा साखर दंड फोडूनच हा कुलाचार साजरा केला जातो.
*भंडारा खोबरे उधळणे- देवास बोललेला नवस पूर्ण झाल्यानंतर बोलल्याप्रमाणे भाविक भक्त, महत्त्वाच्या खंडोबा मंदिरासमोरील नंदी कासव अशा ठिकाणी पालखीवर भरपूर भंडारा खोबरे उधळून देवाला दिलेले वचन पूर्ण करतात .
*भंडारा खोबऱ्याची तुला करणे- काही भक्त मुलगा झाल्यास मुलाला तुझ्या दर्शनाला आणून भंडारा-खोबऱ्यामध्ये त्याची तुला करीन असा नवस बोलतात. नवसप्राप्तीनंतर मुलाचे पालक संबंधित खंडोबा स्थळी जाऊन हा विधी करतात. वजन तागड्यात एका बाजूला मुलगा बसवतात तर दुसऱ्या बाजूला तागड्यात भंडारा खोबरे टाकतात. दोन्ही तागडी समसमान झाल्यानंतर नवस पूर्ण झाल्याचे मानतात. मुलाच्या लग्ना अगोदर कधीही तुला करता येते.
*कान टोचणे- खंडोबाच्या काही निस्सीम भक्तांमध्ये मुलाचा कान टोचल्याशिवाय त्याचा विवाह करता येत नाही असा प्रकार आहे. लग्नाच्या अगोदर कधीही कान टोचता येतो परंतु शक्यतो मुलगा लहान असतानाच हा विधी केला जातो. कुठल्याही महत्त्वाच्या दिवशी मुलाला नवे कपडे घालून, नजीकच्या महत्त्वाच्या खंडोबा स्थळी न्यायचे आणि त्याचा डावा कान टोचून त्या मध्ये सोन्याची बाळी घालायची असा विधी केला जातो. मुलाचा कान पुजाराकडून अथवा सोनाराकडून टोचून घेतात. बाळी त्या दिवशी कानात ठेवून नंतर काढली तरी चालते परंतु काही भक्त आयुष्यभर बाळी तशीच कानात ठेवतात.
*वारी मागणे- खंडोबाच्या नावाने ठराविक काळात कोटंब्यातून भंडाऱ्याची अथवा धान्याची पाच घरी भिक्षा मागणी म्हणजेच वारी मागणी होय .
*खेटे घालणे-खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. काही भाविक प्रत्येक ठराविक वारी किंवा शक्यतो रविवारी नजीकच्या प्रमुख खंडोबा स्थळाला दर्शनासाठी जातात.काही भक्त प्रत्येक रविवारी जाऊन 21 वाऱ्या पूर्ण करतात, तर काही भक्त अखंड वर्षभर प्रत्येक रविवारी खेटे घालत असतात.
श्री हेमेंद्र पंचभाई
(अलख आदेश)
(नमो आदेश)
(नर्मदे हरर)
टीप-पुढील भाग क्रमश: