पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
आळंदी हे गाव पुण्यभुमी ठाव ।
दैवताचे नाव सिध्देश्वर ॥
चौर्याऐंशी सिद्धांचा सिद्धबेटी मेळा।
तो सुख सोहळा काय वानू ॥
विमानांची दाटी पुण्यांचा वर्षाव ।
स्वर्गीहूनी देव करीताती ॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया ॥
विश्रांती घ्यावया कल्पवरी ॥
कैवल्य साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी तिर्थक्षेत्र पंढरपूर येथून श्रीसंत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्याने पौर्णिमे दिवशी शुक्रवारी तिर्थक्षेत्र आळंदीकडे प्रस्थान केले.
प्रारंभी कार्तिकी पौर्णिमेनिमित्त गोपाळपूर येथे होणार्या गोपाळकाल्यासाठी प्रदक्षिणा रोडवरील संत नामदेव मंदिरातून संत नामदेव महाराजांचा पालखी सोहळा गोपाळपूर येथे गेले. त्याठिकाणी ह.भ.प. नामदास महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले. भाविकांनी एकमेकांना काल्याचा प्रसाद देवून गोपाळकाला साजरा केला. त्यानंतर पालखी सोहळा श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी विठ्ठल मंदिरात गेला. त्याठिकाणी श्री विठ्ठल-रुक्मिणीची भेट घेण्यात आली.
यावेळी मंदिर समितीच्यावतीने पादुकांचे दर्शन घेवून ह.भ.प. नामदास महाराज यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी सोहळा पुन्हा मंदिरात आला.
ये ग ये ग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥
दुपारचे भोजन व विश्रांती घेतल्यानंतर पालखी सोहळ्याने ज्ञानोबा-तुकाराम, नामदेव-जनाबाई असा गजर करत आळंदीकडे प्रस्थान ठेवले. श्री केशवराज व संत नामदेव महाराजांची आरती करण्यात आली. संत नामदेवांच्या पालखी सोहळ्यामध्ये सुमारे 50 दिंड्यांसह 2 हजार 500 भाविक सहभागी झाले आहेत. संत नामदेव पायरी येथे पालखी आल्यानंतर मानाचे अभंग व आरती म्हणण्यात आली. महाद्वार, पश्चिमद्वार, चौफाळा, शिवाजी चौक, अर्बन बँक, सरगम चौक, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयमार्गे हा सोहळा विसावा मंदिर इसबावी येथे आला.
याठिकाणी विसावा घेवून अभंग, आरती करण्यात आली. पालखी सोहळ्यात सर्वात प्रथम नगारखाना त्यानंतर खांद्यावर भगवी पताका घेतलेले वारकरी, टाळकरी, अश्व, घोडेस्वार, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला अशा शाही लवाजम्यासह पंढरी नगरीचा निरोप घेवून पालखी सोहळा आळंदीच्या दिशेने मार्गस्थ झाला. गुरुवारी श्री केशवराज संस्थेच्यावतीने पालखी सोहळ्यासाठी 11 हजार रुपयांची देणगी शिंपी समाजाचे अध्यक्ष गणेश उंडाळे, विश्वस्त राजेश धोकटे , विश्वस्त जयवंत कांबळे यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी ह.भ.प. नामदास महाराजांनी मानकरी, सेवेकर्यांना श्रीफळ दिले.
सर्वश्री ह.भ.प. केशव महाराज, कृष्णदास महाराज, माधव महाराज, मुकुंद महाराज, ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल महाराज, मुरारी महाराज, एकनाथ महाराज, केदार महाराज, भावार्थ महाराज, हरी महाराज, आदित्य महाराज, विणेकरी यांच्यासह समस्त नामदास महाराज परिवार व शिष्यगण पालखी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
या पालखी सोहळ्यासमवेत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांनी पाण्याचा टँकर तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे जिल्हा व स्व. तात्या बापट स्मृती समिती चिंचवड यांच्यावतीने भाविकांसाठी मोफत फिरत्या दवाखान्याची (रुग्णवाहिका) सोय करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्यांची ही सेवा अखंडपणे सुरु असून याबद्दल भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
चला आळंदीला जाऊ । ज्ञानदेवा डोळा पाहू
पंढरपूरहून निघालेला हा पालखी सोहळा भंडीशेगाव, वेळापूर, माळशिरस नातेपुते, फलटण, सासवड, पुणे मार्गे सुमारे 8 दिवसांचा पायी प्रवास करून आळंदी येथे पोहोचणार आहे. त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणार्या यात्रेत हा पालखी सोहळा सहभागी होणार आहे. पालखीचा मुक्काम आळंदी येथील श्री विष्णू मंदिरात राहणार आहे.