प्रबोधन मंच, महाराष्ट्र राज्य.आपण आपल्या एका मताचे महत्त्व ओळखले पाहिजे. भाग - १
भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला आहे. आपल्या देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी या देशातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा समान अधिकार मिळाला आहे, म्हणजेच प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार लाभला आहे.
आपण आपल्या एका मताची किंमत ओळखली पाहिजे. माझ्या एका मताने काय होणार ? असा आपल्याला प्रश्न पडतो, परंतु आपले एक मत खरोखरच अनमोल असेच असते.
आतापर्यंत दोन वेळा केवळ एक मताने विधानसभा निवडणुकीत आमदार निवडून आले आहेत तर लाखोंच्या संख्येने असणाऱ्या लोकसभा निवडणुकीत देखील केवळ नऊ मतांनी दोन वेळा खासदार निवडून आले आहेत.
सन २००४ च्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत संथेमराहल्ली या मतदार संघातून व सन २००८ च्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत नाथद्वारा या मतदार संघातून केवळ एका मतांनी आमदार निवडून आले आहेत.
सन १९८९ सालच्या लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली या मतदार संघातून व सन १९९८ च्या बिहारमधील राजमहल या लोकसभा मतदार संघातून केवळ नऊ मतांनी खासदार निवडून आले आहेत.
आपण आपल्या एका मताची किंमत वरील उदाहरणांवरून लक्षात घेतली पाहिजे. वरील संबंधित विधानसभा अथवा लोकसभा मतदार संघातील अनेकांनी *माझ्या एका मताने काय होणार?* असा विचार करून मतदान केले नसेल, त्यामुळे या मतदार संघात केवळ एका मतांनी कोणीतरी निवडून आले अथवा पराभूत झाले, म्हणूनच आपण आपल्या एका मताची किंमत ओळखली पाहिजे. आपले एक मत महत्त्वाचेच नव्हे तर अनमोल असेच आहे, म्हणूनच आपण सर्वांनी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी मतदान हे केलेच पाहिजे.
*शंभर टक्के मतदान, देशहितासाठी मतदान*
हा संकल्प करूयात व मतदान करूयात !
- डॉ.सचिन वसंतराव लादे, पंढरपूर