कमिशन खाणारी गिधाडे
विशेष लेख
स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक सामाजिक,आर्थिक,औद्योगिक, शैक्षणिक,आरोग्य व संरक्षण क्रांतीत अनेक मातब्बर मंडळी सहभागी होऊन नवीन भारत निर्माण करण्यासाठी तन, मन व आवश्यक वाटेल तेथे स्वतः धन ओतण्यास मागेपुढे पाहत नसे.पूर्वी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगत असत.सर्व सामान्य माणसामध्ये माणूस म्हणून ही माणसं जगत होती.
काळ बदलत गेला लोकांची मने बदलत गेली.आज प्रत्येक क्षेत्रात गिधाडे प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे.निसर्गाचा विचार गेला तर गिधाडे ही स्वच्छतेची प्रतिके मानली जातात.परंतू माणसातील माणुसकी हरपून बसलेल्या गिधाडे वातावरण अस्वच्छ दुर्गंधीयुक्त करून समाजाचे लचके तोडून तोडून खात आहेत.
क्षेत्र कोणतेही असो त्याला राजकीय किनार असल्याशिवाय काहीही घडू शकतं नाही.सत्ता गेली की ही गिधाडे सत्तेत सहभागी असलेल्या लोकांवर मेलेल्या माणसाचे ( कोणत्याही चळवळीत सहभागी न होणाऱ्या) लचके तोडलेले आरोप करतात.स्वत: हे सत्तेत आले ही जीवंत लोकांना मारून त्याचे लचके गपागप खात आहेत.त्यांच्या नख्या जीवंत लोकांच्या पोटात खुपसून हे जीवंत लोकांची नरडी तोडून तोडून रक्त पिऊन गलेलठ्ठ होऊ पाहत आहेत.ही स्वातंत्र्य भारतातील शोकांतिका आहे.
पूर्वी इंग्रजी माणसांनी ज्या प्रमाणे अन्याय केला त्यांच्या प्रमाणात स्वातंत्र्यानंतर ही कमी अधिक प्रमाणात घडत असेल तर खूप मोठी शोकांतिका आहे.लोकसभेच्या निवडणूका सध्या पार पडत आहेत.प्रत्येक प्रमूख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी स्वतः ची संपत्ती करोडोंची दाखवलेली पाहायला मिळते.व्यवसाय शेती व शेतीपूरक आहेत.मग पण प्रश्नच पडतो शेती व शेतीपूरक व्यवसाय करणारे राजकीय लोक करोडोचे धनी असतात.सर्वसामान्य शेतकरी वर्ग एवढे उत्पन्न मिळत असताना आत्महत्या करतोच कसा...?
कारण या राजकीय व प्रशासकीय गिधाडांच्या नख्या सामान्य वर्गाच्या घशात रूतून बसल्या आहेत.
आज राजकीय लोकांना सरळ सरळ आव्हान आहे.... तुमच्यात खरंच खुमखुमी असेल तर छातीठोकपणे सांगून दाखवा हे क्षेत्र आहे की ते विना कमीशन चालते.कोणता राजकीय पक्ष आहे की त्यांनी सांगावे आम्ही कमीशन घेत नाही. या कमिशन वरच राजकीय व प्रशासकीय माणसातील गिधाडे करोडो रुपयांची उधळून करून खुराड्यात राहू लागले आहेत.शिवाय त्या खुराड्यांना गेट व मोठं मोठाली कुत्री संरक्षणासाठी ठेवावी लागत आहेत.हीच खरी शोकांतिका आहे.परंतू गिधाडं पक्षी स्वतः मेलेल्या प्राण्यांचे लचके तोडून खाऊन स्वच्छता करतो... शिवाय मान उंच करून उंच झाडावर आपले स्वतःचे घरटे बांधून वाऱ्याशी पंगा घेत ... निवांत आपले जीवन आनंदमय जगत असतो.
कमीशन मधील गिधाडे आता भारत गिळंकृत करण्यासाठी धडपडत आहेत.लोकांना विनंती आहे की या गिधाडांना वठणीवर आणण्यासाठी स्वातंत्र्य संग्रामात जिवाची बाजी लावून लढलेल्या स्वातंत्र्य योद्धाप्रमाणे लढावे लागणार आहे. नाहीतर ही गिधाडे जात-पात धर्म यामध्ये अडकावून सर्वसामान्य लोकांचे लचके तोडल्याशिवाय राहणार नाही.
लेखक आनंद आलदर