शब्द चुकला तर वाक्य बिघडते मात्र संस्कार चुकले आयुष्य बिघडते
मुंबई प्रतिनिधी तेज न्यूज वैभव पाटील
सध्या शाळेतील मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत. या सुट्ट्यांमध्ये मुलांवर अध्यात्मिक संस्कार व्हावेत या हेतूने पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधील देवघर व गांधरे गाव येथे निवासी बाल संस्कार शिबिरांचे आयोजन या तालुक्यातील परमार्थप्रेमींच्या माध्यमातून करण्यात आले आहे. देवघर येथे हभप पांडुरंग महाराज यांच्या माध्यमातून दिनांक १ मे ते १८ मे २०२४ या कालावधीत सलग सातव्या वर्षी तर श्री ज्ञानोबा तुकोबा सत्संग सेवा संस्था, आळंदी सारशी (वाडा) यांच्या वतीने हभप राजेश महाराज बांगर यांच्या माध्यमातून गांधरे, वाडा येथील कुणबी समाज सभागृह येथे तिसऱ्या वर्षी दिनांक ४ मे ते २० मे २०२४ या कालावधीत निवासी बाल सुसंस्कार शिबीरे सुरू झाली आहेत. ह्या दोन्ही शिबिरांमध्ये जवळपास १०० मुले सहभागी झाली आहेत. शिबीरादरम्यान आचरण व अध्यात्मिक संस्कारांबरोबरोबच योगासने, सूर्यनमस्कार, टाळ, पकवाज, पेटी, अभंग, हरिपाठ, हनुमान चालीसा, गीता, विष्णुसहस्त्रनाम इत्यादी गोष्टी मुलांना शिकविल्या जात आहेत.
वास्तविक मोबाईलच्या दुनियेत हरवत व भरकटत चाललेल्या आजच्या पिढीला संस्कारांच्या कक्षेत आणण्यासाठी ही शिबिरे अत्यंत उपयुक्त आहेत असे माझे मत आहे. एखादे वाक्य तयार करताना शब्द चुकले तर ते वाक्य बिघडते मात्र बालवयात मुलांवरील संस्कार चुकले तर त्यांचे पूर्ण आयुष्य बिघडते. त्यामुळे अशा बाल संस्कार शिबिरांची आजच्या पिढीला आणि संस्कारित पाल्य घडवू इच्छिणाऱ्या पालक वर्गालादेखील नितांत गरज आहे. आज समाजात संस्कार शिबिरांचे असलेले महत्व पाहता अशा शिबिरांचे निदान मुलांच्या सुट्टीच्या काळात तरी सर्वत्र आयोजन केले जावे असे वाटते. या शिबिरांना भेट देण्यासाठी समाजातील अनेक संवेदनशील लोक येतात, मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात व आयोजकांचे मनोबल वाढवतात. मीदेखील दरवर्षी या शिबिरांना आवर्जून भेट देतो. मुलांसाठी प्रश्नमंजुषा, निबंध व चित्रकला स्पर्धा घेतो. खाऊ, बक्षिसांचे वाटप करतो.
येत्या शनिवारी ११ तारखेला आम्ही या शिबिरास भेट देत आहोत. जॉयचे सर्वेसर्वा सन्मा गणेश हिरवे व काही जॉय सभासददेखील यंदा माझ्यासोबत या शिबिरास भेट देणार असून मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. आज वेळात वेळ काढून निस्वार्थी भावनेने ही संस्कार शिबिरे भरवणारी मंडळी, समाजात लुप्त होत चाललेले अध्यात्मिक आणि आचरण संस्कार मुलांना देण्याचा प्रयत्न करत आहेत. हेदेखील एक मोठे सामाजिक कार्यच आहे. त्यामुळे जॉय संस्थेकडून ह्या शिबिरांना दिली जाणारी भेट नक्कीच त्यांचे मनोबल वाढवणारी ठरणार असून हा आपल्या सामाजिक उपक्रमांचादेखील एक भाग आहे.
ग्रामीण भागात उन्हाळी सुटटयांमध्ये सुरु झालेला बाल सुसंस्कार शिबीरांचा हा सिलसिला पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करत असलेल्या आजच्या पिढीला अध्यात्मिक व कौटुंबिक संस्कारांची वाट दाखवणारा ठरत असून अशा स्तुत्य उपक्रमांना आपली जॉय संस्था नेहमीच समर्थन व योगदान देत आली आहे.