पंढरपूर प्रतिनिधी
“ छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या बुद्धी, चातुर्य आणि युक्तीच्या बळावर गनिमी कावा ही युध्दनीती विकसित केली. बलाढ्य असणाऱ्या शत्रूला नामोहरम करून स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या या यशात त्यांनी निर्माण केलेली गुप्तचर यंत्रणा ही वैशिष्ट्यपूर्ण होती. बहिर्जी नाईक सारखा उपेक्षित माणूस या गुप्तचर यंत्रणेचा प्रमुख होता. अफजलखान वध, पन्हाळगडाचा वेढा, आग्र्याहून सुटका, शाहिस्तेखानावर स्वारी आणि सुरतेची लुट या आणि अशा प्रत्येक प्रसंगात गुप्तचर संघटनेची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.” असे प्रतिपादन इतिहास विभाग प्रमुख प्रो. डॉ. हनुमंत लोंढे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात समारंभ समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज यांची गुप्तहेर यंत्रणा’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, उपप्राचार्य डॉ. बजरंग शितोळे, उपप्राचार्य डॉ. भगवान नाईकनवरे, अधिष्ठाता डॉ. बाळासाहेब बळवंत, अधिष्ठाता डॉ. अनिल चोपडे, पर्यवेक्षक प्रा. युवराज औताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रोफे. डॉ. हनुमंत लोंढे पुढे म्हणाले की, “जागतिक स्तरावर नेपोलियन बोनापार्ट, जगज्जेता सिकंदर यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना केली जाते. शिवाजी राजांच्या या कर्तृत्त्वात त्यांच्या गुप्तचर यंत्रणेचा सिंहाचा वाटा राहिला आहे. माणसे पारखण्यात शिवाजी महाराज पारंगत होते. गुप्तचर यंत्रणेसाठी राजे स्वत: माणसांची निवड करत असत. विश्वासू, एकनिष्ठ, शूर, धाडसी अशा व्यक्तींची निवड केली जात असे. त्यांना जबाबदारी देताना विशेष प्रशिक्षण आणि मोठा पगारही दिला जात असे. शत्रूच्या गोटातली इत्यंभूत माहिती ठेवण्यात बहिर्जी नाईक हा तरबेज होता. बाबाजी मुदगल, चिमाजी मुदगल अशी त्यांच्या गुप्तचरांची नावे सांगता येतील. अनेक पोर्तुगीज लोकांना देखील शिवाजी राजांनी आपल्या गुप्तचर यंत्रणेत जबाबदारी दिल्याचे उल्लेख कांही कागदपत्रात आढळतात.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे म्हणाले की, “मन, मन, मनी, मटेरियल यांचे व्यवस्थापन केले होते. त्यामुळेच त्यांना स्वराज्य निर्माण करता आले. न्यायाने राहणारा व वागणारा राजा म्हणून त्यांची कीर्ती होती. नेतृत्त्व करताना नेत्यांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू अभ्यासावेत. जीवाला जीव देणारी माणसे त्यांनी निर्माण केली. त्यांचा विश्वास निर्माण केला. त्यांची मने जिंकली म्हणूनच शिवाजी राजाला स्वराज्य निर्माण करता आले.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती विभाग प्रमुख डॉ. रविराज कांबळे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्रातील गड आणि किल्ले यांची माहिती देणाऱ्या पोष्टर्सचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमास सिनिअर, ज्युनिअर, व्होकेशनल विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भारती सुडके यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. दत्तात्रय चौधरी, प्रा. कल्याण वटाणे, प्रा. सुमन केंद्रे, प्रा. डॉ. उमेश साळुंखे, प्रा. बाळू गायकवाड, ओंकार नेहतराव, अभिजित जाधव, अमोल माने यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार समारंभ समितीचे प्रमुख प्रा. डॉ. दत्तात्रय डांगे यांनी मानले.