मुंबई प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आदर्श घेऊन आध्यात्मिक क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले जावे म्हणून शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांच्या पुढाकाराने संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती शक्ती संवाद यात्रेचे मार्गक्रमण सुरू होत आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते नुकतेच या यात्रेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी जाणार आहे. महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ, तीर्थक्षेत्रे व आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार व निरुपणकार, गावोगावी असणारी भजन मंडळे यांसोबतच, हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिव शंभो विचारांना समाजापर्यंत नेणाऱ्या तमाम युवक, गोरक्षक व ज्येष्ठांशी संवाद साधण्याच्या हेतूने ही यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेच्या प्रत्येक दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत विविध पंथांचे प्रचारक व संतकुळांचे वंशज देखील असणार आहेत . पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व कोकण अशा पाच टप्प्यात ही संवाद यात्रा होईल. आध्यात्मिक क्षेत्रासाठी असा उपक्रम प्रथमच महाराष्ट्रात होत असल्याने या क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात या उपक्रमाचे स्वागत केले जात आहे.