महामानव डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना विश्वाला प्रेरणा देते -अधिष्ठाता प्रा.करण पाटील
पंढरपूर प्रतिनिधी
‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना संपूर्ण विश्वाला प्रेरणा देणारी अशी आहे. ग्रामीण भागात जावून विश्वबंधुत्वाची तत्वे पटवून समाज बांधणीचे कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आयुष्यभर विद्यार्थी राहून समाजाला जागृत करण्याचे कार्य महामानव डॉ. आंबेडकर यांनी केले. कोणत्याही घटकात भेदभाव होऊ नये हा दृष्टीकोन समोर ठेवून त्यांनी राज्यघटना लिहीली.’ असे प्रतिपादन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी केले.
गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या ‘महापरिनिर्वाण दिना' निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. प्रारंभी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. महेश मठपती यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा. करण पाटील यांनी ‘महापरिनिर्वाण दिना’चे महत्व सांगून डॉ. आंबेडकरांच्या कार्यावर प्रकाश टाकताना पुढे म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी समाजासाठी व समाजाच्या विकासासाठी कार्य केले. भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि योग्य दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. वर्ग, जात, धर्म, लिंग या आधारावर भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते.’ असे सांगून त्यांनी डॉ.आंबेडकर यांचे समाजासाठीचे योगदान अभ्यासपूर्ण शैलीत मांडले.
यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.मिनाक्षी पवार, प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतिश लेंडवे, डॉ. एच.एच. पवार, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, एमसीए विभागाचे प्रमुख प्रा. मनसब शेख, प्रा. अविनाश पारखे, प्रा. अविनाश कोकरे व इतर प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी संतोष जाधव, समाधान मोरे, दत्तात्रय लोंढे, अमोल चंदनशिवे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. यशपाल खेडकर यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.