नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आव्हानास कृतीतून प्रतिसाद
प्रतिनिधी नवी मुंबई सुभाष हांडे देशमुख
नवी मुंबईकर नागरिकांनी स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याकरता वेळ द्यावा आणि स्वच्छतेविषयी असलेली जबाबदारी पार पाडावी तसेच नवी मुंबई शहराप्रति असलेले प्रेम व्यक्त करावे. असे आवाहन नवी मुंबई पालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या वतीने नवी मुंबईतील आम जनतेला करण्यात आले होते या आव्हानाला प्रतिसाद म्हणून यूथकौन्सिल नेरुळ च्या स्वयंसेवकांनी आपल्या संस्थेच्या सावली रोपवाटिकेत दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी श्रमदान करून प्रतिसाद दिला. स्वच्छता ही आपलीही जबाबदारी आहे हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका सौ. मीरा पाटील, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ चे उपाध्यक्ष प्रभाकरराव गुमास्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या श्रमदान शिबिरात सर्वश्री नरेश विचारे, विक्रम राम, सुरजितसिंह उभी, गोपाळ देऊळकर, भालचंद्र माने, यशवंत गोनेवाड, निशांत बनकर, दिनेश जाधव, रामचंद्र पाटील, प्रभाकरराव मिठबावकर, विजय निंबाळकर, सुभाष हांडे देशमुख, सौ. रुचिता कर्पे, सौ. संगीता निकम, सौ. अनिता घाडगे आदी स्वयंसेवकांनी सहयोग दिला.
याप्रसंगी प्रभाकरराव गुमास्ते म्हणाले की, यूथकौन्सिल नेरुळचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे कुठल्याही कामाचा गाजावाजा न करता शांतपणे ते समाजासाठी विविध स्तरावर काम करत असतात ही कौतुकास्पद बाब आहे असे सांगून त्यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. स्वयंसेवकांची संवाद साधताना सौ. मीरा पाटील म्हणाल्या की, कोणाकडूनही आर्थिक मदतीची अपेक्षा न ठेवता स्वतः पदरमोड करून गेली पस्तीस वर्षे ही संस्था नेरुळ वसाहतीत कार्यरत आहे ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे.
विशेष म्हणजे संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत असलेले आणि आज वयाच्या सत्तरीला पोहोचलेले स्वयंसेवक एवढ्या मोठ्या उत्साहाने संस्थेच्या उपक्रमात सहभागी होतात ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. प्रेरणादायी आहे. म्हणूनच संस्थेच्या स्वयंसेवकांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच. संस्थेचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेऊन सांगितले की, स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत १७ सप्टेंबर रोजी नवी मुंबईकर नागरिकांनी एकत्र येत स्वच्छतेची शपथ घेतली त्या प्रित्यर्थ संस्थेच्या स्वयंसेवकांनी खारीचा वाटा उचलून महानगरपालिकेच्या आव्हानास प्रतिसाद देत आपलाही सहभाग दर्शविला.
खरे तर स्वच्छता, श्रमदान, वृक्षारोपण ही संस्थेच्या प्रमुख ध्येयापैकीच एक आहेत आणि त्याविषयी स्वयंसेवक सतत गंभीरतेने क्रियाशील आहेत. वेळोवेळी अशा प्रकारचे उपक्रम राबवून संस्थेने ते अधोरेखित केले आहे.