स्वच्छता पंधरवडा व स्मार्ट सिटी चा पडदा फाटला
सोलापूर प्रतिनिधी
ऑक्टोबर रोजी एक तास स्वच्छतेसाठी हा स्वच्छतेचा कार्यक्रम सोलापुरात जागोजागी घेण्यात आला व त्यात काही स्वयंसेवी संस्थांनी सुद्धा हिरीरीने भाग घेतला. दोन वर्षांपूर्वी सोमपाचे उपायुक्त धनराज पांडे साहेबांनी स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरचे स्थान अव्वल आणून प्रसारमाध्यमांमध्ये बरीच प्रसिद्धी मिळवली होती. परंतु सर्वेक्षणासाठी आलेल्या मंडळास सोलापूर व आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन त्यांची चांगली बडदास्त राखल्याचे नियोजन सुंदर रित्या केल्यामुळे असे झाल्याचे नंतर निष्पन्न झाले. आज जर सोलापूर खरेच स्वच्छ आणि सुंदर झाले असते तर अशा स्वच्छतेच्या कार्यक्रमाची गरजच भासली नसती पण सत्य परिस्थिती अशी आहे की आज सोलापुरात जागोजागी कचरकुंड्या तयार झालेल्या आहेत व हा कचरा २४ तास रस्त्यावर पडून असतो. तोच कचरा वाऱ्याने सर्वत्र पसरतो.
आजूबाजूची भटकी कुत्री, जनावरे , गाढवे यांचा वावर या ठिकाणी वाढतो त्यामुळे रहदारीस सुद्धा अडचण निर्माण झालेली आहे. दोन ऑक्टोबर रोजी सकाळी आडके हॉस्पिटल , सिव्हिल हॉस्पिटल शेजारी अनधिकृत मुतारीभोवती कचऱ्याचे ढीग व मोकाट जनावरांचा वावर सकाळी दिसत होता. याबाबतीत डॉ. संदीप आडके यांनी आयुक्तांपासून सर्व संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी दिलेल्या असून गांधी जयंतीच्या सकाळी आज हे स्वच्छतेचे व स्मार्ट सिटी चे चित्र दिसत आहे.चक्क महापौरांच्या सरकारी निवासस्थानाच्या मागे अशा प्रकारची कचरकुंडी तयार झालेली होती. पूर्वी रस्ते साफ करण्यासाठी सोमपाने आणलेली दोन अत्याधुनिक वाहने वापरात नसल्याने गंजून भंगारमध्ये गेलेली असताना पुन्हा रस्ते साफ करण्यासाठी अशाच प्रकारच्या ट्रकच्या माध्यमातून मक्तेदारातर्फे रस्ते साफ केले जात आहेत व त्याला प्रतिकिलोमीटर प्रमाणे पैसे मोजले जातात परंतु पाऊस पडल्यानंतर चिखल झाल्यावर ही यंत्रणा कामच करत नाही मग अशा गोष्टींचा अट्टाहास कशासाठी केला गेला?स्मार्ट सिटी योजनेतून १२० घंटागाड्या घेतलेल्या आहेत व त्यासाठी टाटा मोटर्सला ७ कोटी ११ लाख रुपये देण्यात आलेले आहेत. शिवाय या घंटागाडीवर काम करणाऱ्या कामगार व ड्रायव्हरना मक्तेदारातर्फे पगार व डिझेलची सोय महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली आहे. प्लास्टिकच्या डस्टबिन साठी नागपूर पॉली फिल्म प्रायव्हेट लिमिटेड व गुरुनानक प्लास्टिक वर्क्स यांना १ कोटी ९४ लाख रुपये देण्यात आलेले आहेत. घंटा गाडीची संकल्पना म्हणजे आपल्या दारापर्यंत कचरा उचलण्याची सोय परंतु आज जागोजागी कचरकुंड्या तयार झालेल्या आहेत व तेथून हा कचरा घंटागाड्यात भरून नेला जातो. तसेच या घंटा गाड्यांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करून नेला जातो असे सांगण्यात येते परंतु सर्व प्रकारचा कचरा या घंटागाड्यांमध्ये एकत्रितपणे कोंबून नेला जातो मग पूर्वी काही ठराविक ठिकाणी मोठ्या लोखंडाच्या कचरकुंड्या ठेवण्यात आल्या होत्या, लोक त्यात कचरा टाकायचे व ट्रकने महानगरपालिका तो उचलून न्यायचे. त्यासाठी अत्यंत कमी मनुष्यबळ व डिझेलचा खर्च लागायचा. मग स्मार्ट सिटीतून आणलेल्या या घंटागाड्यांचा आणि त्यावर केलेल्या करोडो रुपयांचा खर्चाचा उपयोग काय? स्वच्छतेच्या नावावर अशा एक तासाच्या इव्हेंट्स करून व जागोजागी भिंतीवर स्वच्छ भारत अभियान लिहून काय सोलापूर स्वच्छ होणार आहे काय? सोलापुरातून उघड्यावर वाहणारे सांडपाण्याचे नाले, ड्रेनेज तुंबून रस्त्यावर वाहणारे घाण पाणी, मुताऱ्यांच्या अवतीभवती उघड्यावर पडणारा कचरा व उघड्यावर शौचास बसणारी मुले हेच सोलापूरच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांचे आणि स्वच्छ व स्मार्ट सोलापूरचे वास्तव आहे. या भ्रष्ट कारभाराचा जाब तमाम सोलापूरकरांनी व मीडियाने सोलापूर महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन व आरोग्य विभागाला विचारणे गरजेचे आहे?