पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे सध्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.त्यानिमित्त त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अन्नधान्य वितरण,एकात्मिक बालविकास,शालेय पोषण आहार तसेच विविध संबंधित विभागांच्या अधिकारी तसेच शालेय पोषण आहार ठेकेदार, मदतनीस यांच्या बैठका आयोजित केल्या आहेत. या बैठकांसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष शशिकांत हरिदास व जिल्हा संघटक दीपक इरकल,मोहोळ तालुका संघटक राजन घाडगे,प्रशांत महामुनी,जि.प.लेखाधिकारी व्ही.आर.राऊत, अधिक्षक श्री जमादार तसेच विविध अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ढवळे म्हणाले की भारतामध्ये कुपोषणाच्या समस्येवर उत्तर काढण्यासाठी,शालेय विद्यार्थ्यांना सकस आहार नियमित मिळावा,या उदात्त हेतूने भारत सरकारने, माध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे.त्यामुळे शालेय पोषण आहाराची गुणवत्ता उत्तमच असली पाहिजे.जिल्हा परिषद, नगरपरिषदा,महापालिका तसेच खाजगी शाळांमार्फत संचलित सर्व शाळांमध्ये वितरित केले जाणारे माध्यान्ह भोजन बनवताना, स्वच्छता व गुणवत्ता यांना प्राधान्य दिले पाहिजे. शालेय पोषण आहार तयार करण्यासाठी मिळणारे साहित्य दर्जेदार असेल तरच स्वीकारावे. शासनाचे निर्देशाप्रमाणे सर्व साहित्य वापरले गेले पाहिजे. पूरक आहार विद्यार्थ्यांना आवडेल असा असला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मदतनीसांची आरोग्य तपासणी नियमित व्हावी, तसेच त्यांच्या सर्व अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय काढले जातील असेही त्यांनी सांगितले.यावेळी उपस्थित सर्वांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.