सोलापूर प्रतिनिधी
यलगोंडा भिमगोंडा बिराजदार व इतर ग्रामस्थ यांच्या तक्रारीच्या आधारे सीईओ, जिल्हा परिषद सोलापूर यांनी रफिक नदाफ सरपंच बोळकवठा ग्रा.पं., ता. दक्षिण सोलापूर यांचेविरुध्द विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे अपात्रतेकरिता अहवाल सादर केला होता. सरपंच रफिक नदाफ यांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर, दुर्लक्ष, गैरवर्तणूक केल्याबाबत अहवालामध्ये नमूद करण्यात आलेले होते. त्याअनुषंगाने सरपंचावर अपात्रतेची कार्यवाही करण्यात यावी, असे कळविण्यात आले होते.
त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त, पुणे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये दोन्ही बाजूचे म्हणणे व युक्तीवाद विभागीय आयुक्तांनी ऐकला. त्यामध्ये सरपंच रफिक नदाफ यांच्यावतीने ॲड. शरद पाटील यांनी असा युक्तीवाद केला की, सीईओ जिल्हा परिषद सोलापूर यांनी सरपंचाविरुध्द पाठविलेला अहवाल हा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतूदीचा भंग करणारा आहे, सरपंचाचे म्हणणे विचारात घेतलेले नाही, अहवालामध्ये मुद्देनिहाय कारणमिमांसा व अभिप्राय नाही, यावरुन सरपंच यांनी कोणतेही गैरवर्तणूक, लज्जास्पद वर्तणूक, असमर्थता, हलगर्जीपण केल्याचे अहवालावरुन स्पष्ट होत नाही.
हा युक्तीवाद ग्राहय धरुन विभागीय आयुक्त, पुणे श्री सौरभ राव यांनी सरपंच बोळकवठा यांच्याविरुध्दचा सीईओ, जिल्हापरिषद सोलापूर यांचा अहवाल नाकारला आहे. त्यामुळे रफिक नदाफ सरपंच बोळकवठा यांचे सरपंचपद कायम राहिलेले आहे. यात सरपंच रफिक नदाफ यांच्यावतीने ॲड. शरद पाटील, ॲड. प्रसाद काशीद यांनी काम पाहिले.
ॲड.शिवाजी कांबळे ,सोलापूर