मुंबई प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर
महाराष्ट्रात गेली काही वर्षे नियमांचे उल्लंघन करून बेधडक परराज्यातील बोगस पेपर लॉटरीची विक्री करुन कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या महत्त्वाच्या निर्णयाचे जाहीर स्वागत लॉटरी विक्रेत्यांचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर यांनी केले आहे. मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या
आढावा बैठकीत अजित पवार बोलत होते यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, लेखा व कोषागार विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, राज्य लॉटरी आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, उपसचिव मनीषा कामठे, अवर सचिव स्वाती विचारे, कक्ष अधिकारी शिला यादव, उपसंचालक संदेश ओहाळ, लॉटरी संघटनेचे जेष्ठ नेते श्री विलास सातार्डेकर, सरचिटणीस राजेश बोरकर, उपाध्यक्ष कमलेश विश्वकर्मा, कार्याध्यक्ष राकेश उंबळकर, लॉटरी वितरक ताराचंद सावंत हे उपस्थित होते. यावेळी लॉटरीच्या अडीअडचणींवर उपमुख्यमंत्र्यांनी परिस्थिती जाणून घेतली आणि अनेक विषयांवर तात्काळ निर्णयही जाहीर केला.
महाराष्ट्राची ऑनलाईन लॉटरी ही बदलत्या नव्या ग्राहकांच्या खेळासाठी राष्ट्रीय माहिती केंद्र(एन. आय. सी.) यांच्याशी बोलून लवकरच निर्णय घेण्यात येईल यंदा गणेशोत्सव भव्यतम सोडतीची बक्षिसे ही हमीपात्र करण्यात येतील. तसेच निश्चित केलेल्या अपेक्षित विक्रीनंतर यापुढे बक्षिसे ही हमीपात्र करण्याचा विचार शासनाचा आहे असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी चर्चेच्या ओघात स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्याची लॉटरी ही पारदर्शक व प्रतिष्ठित म्हणुन उभ्या देशभरात ओळखली जाते. ग्राहकांना बक्षिसे विक्रेत्यांना रोजगार तसेच शासनाला यातून महसूल मिळतो याची प्रसिद्धी व प्रचार शासकीय कार्यालयाजवळ करून ही लॉटरी तळागाळातल्या ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी सरकार प्रामाणिक प्रयत्न करेल असे आढावा बैठकीत सांगून उपमुख्यमंत्र्यांनी परराज्यातील थकीत असलेला जवळजवळ पंधराशे कोटी लॉटरी कर वसूल करण्यासाठी सरकार अग्रक्रम देईल असे सांगितले.
राज्यभरात एस.टी चे जाळे विणले गेले आहे रोज लाखो प्रवासी त्यातून प्रवास करतात त्या पार्श्वभूमीवर प्रतेक एस.टी आगारात लॉटरी केंद्राला परवानगी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ग्राहक, विक्रेते, वितरक आणि सरकारची बाजू ऐकून घेतली आणि सकारात्मक प्रतिसाद दिला त्या बद्दल सातार्डेकर यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले आणि भविष्यात बदलत्या काळात नवे धोरण जाहीर करावे ही अपेक्षा ही व्यक्त केली.