विद्येविना मती गेली , मतिविना नीती गेली, नितीविना गति गेली, गतिविना वित्त गेले, वित्तविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले.
तत्कालीन महाराष्ट्राची ही जशी सामाजिक चिकित्सा आहे, त्याचप्रमाणे शिक्षणाचे प्रयोजन सांगणारा हा एक समाज शिक्षकाचे (महात्मा फुले) सार्थ उद्गार आहेत. या उद्गारात जसा मती नितीचा विचार आहे. शिक्षणापासून वंचित राहिलेला आणि म्हणुनच अज्ञान अंधःकारात पिचत पडलेला, ज्याला प्रगतीच्या पाऊलवाटा ही अद्याप दृष्टीस पडुन दिल्या नाहीत. अशा तळागाळाच्या माणसाबाबतची व्याख्या फारच बोलकी आहे. महात्मा फुले यांनी या सर्व दुरावस्थेला काबाडकष्ट करणाऱ्या सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. अशा या प्रतिकुल काळात जोतीराव यांचे वडिल गोविंदराव फुले यांनी आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे यासाठी सुरुवातीपासुन प्रयत्न केले. अभ्यासु, चिंतनशीलपणा आणि प्रखर बुद्धी यामुळे जोतिराव आपल्या शैक्षणिक जीवनात यशस्वी झाले. अंधश्रद्धा, लोकभ्रम, जुनाट विचार, वाईट चालिरिती यावर जोतिरावांचा कधीच विश्वास नव्हता. शिक्षण ही एक शक्ती आहे. मानव इतर सजीवापेक्षा वेगळा व वैशिष्ट्य पूर्ण ठरला आहे. तो त्यांच्या ज्ञानसाधनेमुळेच. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम आहे. हे जोतिरावांनी ओळखले होते.
जोतिराव फुल्यांनी आपली शैक्षणिक कार्याची सुरुवात करताना त्यांनी विद्येस वंचित असलेला बहुजन समाज आणि स्त्री शिक्षण याला प्रथम स्थान दिले. महात्मा फुले यांनी प्रथम आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना साक्षर केले. सावित्रीबाई यांना शिक्षण देऊन त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले.शिक्षणाशिवाय कोणत्याही प्रकारची प्रगती होणे शक्य नाही हे ओखळून महात्मा फुले यांनी बहुजन व स्त्रीयांच्या शिक्षणाने आपल्या शैक्षणिक क्रांतिकार्यास सुरुवात केली.
त्यांनी प्रथम स्त्री शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या. पुरुषांपेक्षा स्त्रीयांच्या शिक्षणास अग्रक्रम दिला पाहिजे, असे सांगणारा पहिला भारतीय द्रष्टा महात्मा जोतिराव फुले हा होय. स्त्री शिक्षणाला त्यांनी सर्वात श्रेष्ठ स्थान दिले व पुण्यात प्रथम त्यांनी मुलींची शाळा सुरु केली.
१८४८ साल हे भारताच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरले आहे. १ जानेवारी, १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु झाली व एक नवे युग सुरु झाले. आज आपण भिडेवाडा मुलींची पहिली शाळा शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत.भारतीय व्यक्तींनी भारतीय मुलींसाठी काढलेली पहिली शाळा असून सावित्रीबाई ह्या भारतीय पहिल्या शिक्षिका होत. सावित्रीबाई फुले यांनी प्रशिक्षित होऊन पहिल्या मुख्यध्यपिका होण्याचा बहुमान मिळविला.फुले दाम्पत्यांनी एकापाठोपाठ अठरा शाळा सुरू केल्या.प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरू केले.स्त्री शिक्षणास व शुद्रा अतिशुद्र यांच्या शिक्षणास महात्मा फुल्यांनी जे महत्त्व दिले, त्या पाठीमागे एक मोठे तत्त्व होते.
महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल इंग्रज सरकारच्या वतीने घेऊन प्राचार्य थॉमस कॅंडी यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर १८५२ रोजी विश्रामबाग वाड्यात महात्मा फुले यांचा प्रमुख सरदारांच्या उपस्थितीत शालजोडी देऊन सत्कार करण्यात आला.महात्मा फुले पुणे महानगरपालिका सदस्य म्हणून १८७६-८२ या कालावधीमध्ये शिक्षण व शैक्षणिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केले.हंटर कमिशन ला बहुजन समाजाला शिक्षण मोफत व सक्तीचे केले पाहिजे याबाबत सविस्तर निवेदन दिले.
“शिक्षण हे समाज परिवर्तनाचे एक प्रभावी साधन आहे, असे सांगणारा भारतातील पहिला द्रष्टा शिक्षण तज्ज्ञ होय." ज्या जोतिबा फुल्यांनी या आमुलाग्र क्रांतीची मुहूर्त मेढ या शिक्षण कार्यानी रोवली. त्यांच्या बद्दल एक विचारवंत गोवर्धनदास पारीख यांनी म्हटले आहे, “ एकोणिसाव्या शतकातल्या विचारवंतात आणि द्रष्ट्यात अग्रपुजेचा मान जोतिरावांना द्यावा लागेल." तसेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांचा "समाज क्रांतीकारक" असा गौरव केला. अशा प्रकारे महात्मा फुल्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यात जीवन वेचले. स्त्रीयांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी त्याग करणारा आणि कष्ट भोगणारे जोतिराव फुले यांचा "स्त्री उद्धार कर्ता" म्हणून सत्कार झाला.
महात्मा फुले यांनी काही ग्रंथांची निर्मिती केली. तृतीय रत्न (नाटक), छत्रपती शिवाजीराजे यांचा पोवाडा ब्राह्मणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसुड, सत्सार अंक १, २, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, सत्यधर्म, अखंड इत्यादि काव्य रचना केल्या त्याच बरोबर त्यांनी रामायण, महाभारत, भागवत ग्रंथाचा त्यांनी कसून अभ्यास केला. त्याचबरोबर हिंदी रचना व पाश्चात्य समाजसुधारकांचे ग्रंथ याचाही त्यांनी अभ्यास केला.
जोतिरावांच्या कार्यातुन महाराष्ट्राने प्रेरणा घेतली.महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाच्या प्रचार व प्रसाराचे महाराष्ट्रभर कार्य उभे केले.आज आपण सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्षात महात्मा फुले यांच्या विचारांचा वसा व वारसा जोपासत आहोत ही अभिमानास्पद गोष्ट आहे.या चळवळीच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहचविण्याची परंपरा निर्माण झाली. राजर्षी शाहुमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील इत्यादि महात्मा फुल्यांचे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला.त्याचबरोबर सद्यस्थितीत फुले विचारांचा वसा व वारसा जोपासण्याचे कार्य वैचारिक वारसदार करीत आहेत. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची ओळख करत असताना त्यांच्या वारसदाराचाही विचार करणे गरजेचे आहे. शिक्षण हे अखंडपणे समाज घडविण्याचे कार्य करते.
महर्षी कर्वे हे स्त्री शिक्षणाविषयी सांगताना म्हणतात, "स्त्री शिक्षणासाठी केलेला विचार व उच्चार ही परमेश्वर चरणी प्रार्थना होय." छत्रपती शाहु महाराजांनी महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले आणि
त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी जे सामाजिक कार्य केले त्यामध्ये शिक्षणाला महत्त्व दिले. शाहु महाराजांनी जे कार्य केले त्यामुळे शिक्षण, राजकारण, अर्थकारण अशा विविध क्षेत्रात नावलौकीक संपादन करणारी नविन पिढी निर्माण केली. लक्षावधी कष्ट करणाऱ्या मुलांच्या शिरावर ज्ञानाची पाखर घालणारे आधुनिक महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील वडाचे झाड म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होय. “घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही." श्रम हीच आमची पूजा व श्रमाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण. हे संस्थेचे ब्रीद वाक्य त्यांनी केले. सामाजिक, आर्थिक व मागासलेपणाच्या लढ्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व बहुजन बांधवांना "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा." हा परिवर्तनाचा मंत्र दिला.
अशा प्रकारे महात्मा फुल्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यात महान असे कार्य केले आहे. आज त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. १९ व्या शतकात महाराष्ट्रात जे अनेक लोकोत्तर युगपुरुष होऊन गेले. त्यात महात्मा फुले यांचे सर्वात वरचे महत्त्वपूर्ण स्थान आहे.
अशा या आधुनिक भारतातील आद्य सामाजिक क्रांतिकारकास मुबंई येथील मांडवी कोळीवाडा येथील मंदिरात समस्त कष्टकरी, कामगार बहुजन समाजातील जनतेने जोतिरावांना महात्मा ही पदवी बहाल केली.
या युगप्रवर्तक समाजसुधारकाचे पक्षाघाताच्या आजाराने दिनांक २८ नोव्हेंबर १८९० रोजी पुणे येथे निधन झाले.आपल्यापैकी प्रत्येकाने उपेक्षित व दुर्बल व्यक्तींच्या सबलीकरणासाठी यथाशक्ती तन-मन-धनाने मदत करणे हीच जयंतीनिमित्त महात्मा फुले यांना खरी आदरांजली ठरेल.
मानवता, बंधुता,समता, शिक्षण व सबलीकरण चळवळीच्या अग्रदूतास माझे कोटी कोटी प्रणाम!
अजित जाधव ,९५७९ ३४ ४१७७
महात्मा फुले विचार अभियान