शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणुकीत रंगत वाढली
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आज विविध पक्ष व गटांकडून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या निवडणुकीत आता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील उडी घेतली आहे. आज सेनेकडून चार उमेदवारांनी अर्ज दाखल करत सत्ताधाऱ्यांना आव्हान उभे केले आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून सौ.माधवी कल्याण कुसुमडे, व सौ.पल्लवी आनंदा लोंढे यांनी तर सहकारी संस्था गटाकडून संजय रखमाजी मासाळ व पिंटु पुजारी या चार उमेदवारांनी आपले अर्ज आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दाखल करण्यात आले आहेत. सकाळी अकरा वाजता तालुकाप्रमुख संजय घोडके व युवासेनेचे युवानेते रणजित बागल हे उमेदवार घेवुन अर्ज दाखल करण्यास आले होते, यावेळी बोलताना तालुकाप्रमुख संजय घोडके म्हणाले की "बाजार समिती ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे एक हक्काचे व्यासपीठ आहे, मात्र गेले कित्येक वर्षे शेतकऱ्यांना लुटण्याचा अड्डा ही बाजार समिती झाली आहे, तालुक्यातील शेतकर्यांची अडचण सोडवण्यासाठी या बाजार समितीत परिवर्तन होण्यासाठी आम्ही या निवडणुकीत सहभागी होत आहोत अशी प्रतिक्रीया संजय घोडके यांनी दिली.
यावेळी बोलताना युवासेनेचे रणजित बागल यांनी बोलताना,"बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी आम्हीही या निवडणुकीत उतरत आहोत, शेतकर्यांना बाजार समितीत माल विक्री करताधा येणाऱ्या अडचणींचे समाधान झाले पाहिजे, त्यांना चांगला दर मिळावा,पिळवणूक थांबली जावी ही शिवसेनेची कायम भुमिका आहे असे यावेळी बोलताना बागल म्हणाले, यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते देखील उपस्थित होते.